
हरभऱ्याचे भाव (Chana Rate) मागील रब्बी हंगामातील (Rabi Season) हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात. पण खरंच हरभरा दरात वाढ होऊ शकते का? या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. सोयाबीनचे भाव ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारल्यास देशातील सोयाबीनलाही आधार मिळेल. यंदा शेतकऱ्यांना सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
2. कापसाचे दर कायम
देशातील कापूस दर एका भावपातळीवर स्थिर आहेत. कापसाला आज सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळाला. एरवी डिसेंबर महिन्यात कापसाची आवक जास्त असते. मात्र यंदा शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन करून आवक मर्यादीत ठेवली. त्यामुळं दर टिकून आहेत. शेतकऱ्यांनी महिनाभर हेच धोरण कायम ठेवल्यास कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
3. तुरीचे भाव टिकून
देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतेय. मात्र सरासरीपेक्षा आवक यंदा कमीच असल्याचं व्यापारी सांगतात. बाजारात तुरीचे दर कमी झाल्यानंतर विक्रीही घटत आहे. त्यामुळे सध्या तुरीला किमान दरावर आधार मिळतोय. यंदा तुरीची आयात वाढली. मात्र जागतिक पातळीवर तुरीची उपलब्धताही मर्यादीत असते. त्यामुळे देशातील तूर बाजार यंदा तेजीत राहील. तुरीला सध्या ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये क्विंटल दर मिळतोय. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
4. हिरवी मिरची नरमली
हिरव्या मिरचीची आवक सध्या वाढत आहे. बाजारात हिरव्या मिरचीची रोजची उलाढाल वाढल्याने दरावर काहीसा दबाव आलाय. मिरचीचे दर मागील महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे सरासरी ५ रुपयाने नरमले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला २ हजार ७०० ते ३ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळतोय. हिरव्या मिरचीचा हा दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
5. हरभऱ्याचे भाव मागील रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यापासून दबावात आहे. मात्र आता हरभरा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जाणकार सांगतात. चालू रब्बी हंगामात हरभरा पेरा कमी होण्याचा अंदाज आहे. तर सध्या देशात चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याचं व्यापारी सांगतात. तसंच खरिपातील तूर, मूग आणि उडीद या कडधान्याचं उत्पादन कमी झालंय. तुरीचे दरही तेजीत आहेत. त्यामुळं तुरीची काही मागणी हरभऱ्याकडं वळू शकते. या सर्व घटकांमुळे स्टाॅकिस्ट बाजारात संधी शोधत आहेत. सध्या हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. त्यामुळे स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना जोखीम कमी आहे. देशातील एकूण हरभरा वापरापैकी तब्बल ५० टक्के वापर हा हाॅटेल, रेस्टाॅरेंट्स आणि प्रक्रिया उद्योगात होतो. या सर्व क्षेत्रातून मागणी चांगली आहे. मात्र नाफेडकडेही हरभऱ्याचा चांगला स्टाॅक आहे. त्यामुळं हरभऱ्यातील तेजी मर्यादीत राहील. तर चालू रब्बी हंंगामात उत्पादन कसे राहते, यावर बाजार अवलंबून राहील. देशातील उत्पादन कमी झालं तरी बाजार नाफेडकडील स्टाॅककडे नजर ठेऊन चालेल. पण सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा असण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र या स्थितीचा फायदा नव्या हरभरा विक्री करताना होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.