
१) कापूस बाजार दबावातच (Cotton Market)
देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव आजही कायम आहे. तर अनेक बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली होती. कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत.
आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी कापसाचे वायदे ८०.६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात यंदा उत्पादन घटलं, तसचं मागणीही चांगली आहे. त्यामुळं बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) तुरीचे बाजारभाव टिकून (Tur Rate)
तुरीच्या दरातील तेजी अद्यापही कायम आहे. तूरीला सध्या सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. सरकारच्या तुरीच्या बाजारावर बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यामुळं तुरीच्या दरातली तेजी वाढताना दिसत नाही. पण दरही कमी झाले नाहीत.
पुढील काळातही देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजीही टिकून राहील, असा अंदाज तूर व्यापारी आणि प्रक्रियादारांनी व्यक्त केला.
३) हरभरा दर कमीच (Chana Rate)
नाफेडच्या खरेदीमुळे हरभरा दर टिकून आहेत. नाफेडने आतापर्यंत देशात १५ लाख ३६ हजार टन हरभरा खेरदी केला. यापैकी ५.७५ लाख टन खरेदी माहाराष्ट्रात झाली. नाफेडची खरेदी वाढली तरीही दर दबावातच आहेत.
सध्या हरभऱ्याला ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडची खेरदी जोमाने सुरु आहे. नाफेडने मागील हंगामाएवढी खेरदी केल्यास खुल्या बाजारालाही आधार मिळू शकतो, अशी माहिती हरभरा बाजारातील अभ्यासकांनी दिली.
४) गव्हाचे भाव स्थिर (Wheat Rate)
केंद्र सरकारचे गहू खरेदीचे उद्दीष्ट यंदा साध्य होण्याची चिन्हे आहेत. कारण यंदा खुल्या बाजारातील गहू दर दबावात आहेत. त्यामुळं नाफेडची खरेदी वेगाने होतेय. मागील हंगामात सरकारला एकूण १८८ लाख टन गहू खरेदी करता आला. पण यंदा एप्रिलमध्येच सरकारच्या गहू खरेदीने १९५ लाख टनांचा टप्पा गाठला.
खुल्या बाजारात सध्या गव्हाला १ हजार ९०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आवकेचा दबाव असेपर्यंत हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) सोयाबीन बाजारावर काय परिणाम होतोय? (Soybean rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर दबावात आले. खाद्यतेल बाजारातील नरमाईचा परिणाम तेलबियांच्या दरावरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि पामतेलाच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत नरमाई दिसली.
खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने देशात आयातही वाढली. भारत सरकारने आधीच खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केले आहे. यामुळं आयात स्वस्त पडते. याचा दबाव सोयाबीन आणि मोहरी दरावर येतोय. मोहरीच्या दरात मागील महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत नरमाई दिसली.
सोयाबीनचे दरही क्विंटलमागं दोन आठवड्यांमध्ये २०० रुपयांनी कमी झाले. सध्या सोयाबीनला बाजारात सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. सोयाबीनचे दर नरमल्यामुळं शेतकरी पुन्हा अडचणीत आले. अनेक शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या भावाच्या अपेक्षेने सोयाबीन मागे ठेवले होते.
नोव्हेंबरमध्ये सोयाबीन दर ६ हजार रुपयांच्या दरम्यान होते. पण त्यानंतर दरात आलेली नरमाई कायम दिसली. काही वेळा दरात काहीसे चढ उतार झाले. पण सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान राहीली. आता खाद्यतेल दरात नरमाई आली.
त्यामुळं तेलबियांचे पडणारे दर सावरण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. खाद्यतेल आयातशुल्कात वाढ केल्यास सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.