
सोयाबीनमध्येही चढ उतार
1. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मागील तीन दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी कायम असल्याचं दिसतं. आजही सोयाबीनला देशातील बाजारात (Soybean Market) सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात तेजी मंदी सुरु आहे. सोयाबीन दरपातळी सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान कायम राहण्याचा अंदाज आहे. तर पुढील काळात सोयाबीन दरात क्विंटलागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाचे दर टिकून
2. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. कापसाच्या दरात रोजच ४ ते ७ टक्क्यांपर्यंत तेजी मंदी दिसून येत आहे. तर देशातील दर स्थिर आहेत. देशातील बाजारात आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाची ही दरपातळी मागील १० दिवसांपासून कायम आहे. तर पुढील काही दिवस कापसाची भावपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा दरात काहीशी सुधारणा
3. देशातून सध्या कांदा निर्यात वाढत आहे. नोहेंबरमध्ये भारताची कांदा निर्यात दुप्पटीहून अधिक वाढली. नोव्हेंबरमधील कांदा निर्यात १ लाख ६७ हजार टनांवर पोहचली. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमधील कांदा निर्यात ४३ टक्के वाढली. या काळात १५ लाख ३९ हजार टन कांदा निर्यात झाला. तसंच मागील काही दिवसांमध्ये कांद्याची सरासरी दरपातळी काहीशी वाढून १ हजार ४०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचली. वाढणाऱ्या निर्यातीमुळे स्थानिक बाजारात दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आल्याचे दर दबावात
4. राज्यातील बाजारात सध्या आल्याची आवक वाढत आहे. आवक वाढल्यानं आल्याच्या दरावर दबाव येत असल्याची स्थिती आहे. आल्याचे दर मागील १५ दिवसांमध्ये काहीसे नरमले आहेत. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आले आवकेचा दबाव वाढल्यानंतर हे दर कायम राहू शकतात, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सध्या गव्हाचे दर काय आहेत?
5. देशातील बाजारात सध्या गव्हाचे दर तेजीत आहेत. मागीलवर्षी देशात गव्हाचे उत्पादन मार्च आणि एप्रिलमधील उष्णतेमुळे कमी झाले होते. मागील हंगामात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज असूनही केवळ १ हजार ६८ लाख टन गहू हाती आला होता. त्यातच निर्यात वाढल्याने देशातील गव्हाचे दर वाढले होते. दरवाढीला लगाम लावण्यासाठी सरकराने निर्यातबंदीही केली. मात्र देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्याने दरवाढ थांबली नाीही.
ऑगस्ट महिन्यापासून गव्हाचे दर जवळपास १३ टक्क्यांनी वाढले. सध्या गव्हाच्या दराने विक्रमी पातळी गाठली. दर २ हजार ९७० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले. त्यामुळं सरकार २० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची शक्यता आहे. पण सरकारने याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण यंदा गव्हाची पेरणी वाढत आहे. तर वातावरणही सध्या पोषक आहे. त्यामुळे यंदा देशात चांगले गहू उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. यंदा देशात विक्रमी १ हजार १२० लाख टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. पण पुढील दोन महिने हवामान कसे राहते, यावर उत्पादन अवलंबून असेल. तसंच सरकारनं खुल्या बाजारात किमान ३० लाख टन गहू विकल्यास दर काहीसे नियंत्रणात येऊ शकतात. अन्यथा गहू दर कायम राहतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
……………..
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.