महागाईचा विचार न करता एमएसपी जाहीर

केंद्र सरकारने बुधवारी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये ४.४ टक्क्यांवरून ८.८६ टक्के वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे.
MSP
MSPAgrowon

केंद्र सरकारने बुधवारी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) (MSP) जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये ४.४ टक्क्यांवरून ८.८६ टक्के वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र सरकारच्या या धोरणावर शेतकरी (Farmer) आणि व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळी मतं पाहायला मिळतायत. शेतकऱ्यांच्या मते, केंद्र सरकारने एमएसपी जाहीर करताना वाढत्या महागाईचा त्यामध्ये विचार केलेला नाही. तर व्यापाऱ्यांच्या मते, एमएसपीमध्ये केलेली ही वाढ तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल.

"केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करताना वाढत्या महागाईचा विचार केलेला नाही. त्यामुळे नुसतेच हमीभाव जाहीर करणं शेतकऱ्यांच्या समस्यांवरचं उत्तर नाही. सरकारने दिलेला एमएसपी शेतकऱ्यांना गहू आणि तांदळाचे पीक घ्यायला प्रोत्साहन देतंय. कारण सरकार या दोन्ही पिकांची खरेदी करतं. मात्र त्यामुळे इतर पिकांची लागवड कमी होईल," असे मत शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी व्यक्त केलं आहे.

देशातंर्गत कडधान्य उत्पादन वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र कडधान्याच्या एमएसपीमध्ये अधिकची वाढ करणे अपेक्षित होते, असे शेतकरी म्हणतात. तूर आणि उडीद या पिकांच्या एमएसपीमध्ये ४.७६ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मूगासाठी ६.६ टक्के वाढ जाहीर केली आहे. ही वाढ १० टक्क्यांच्या जवळपासही नाही. केंद्र सरकारने डाळींसाठी जाहीर केलेल्या एमएसपीमध्ये वाढ करायला हवी होती. कारण शेत मजुरीत वाढ झाली आहे. तसेच निविष्ठाच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत.

दुसरीकडे तेलबिया पिकांच्या एमएसपीमध्ये केलेल्या वाढीचा चांगला परिणाम तेलबिया पिकांच्या लागवडीवर होईल, असे सीओओआयटीचे अध्यक्ष सुरेश नागपाल यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, "सरकारने गेल्या रब्बी पिकांना दिलेल्या एमएसपीमुळे मोहरीची लागवड ९१.४४ लाख हेक्टरवर पोहचली होती. यंदा शेतकऱ्यांना तेलबिया पिकांसाठी एमएसपीची खात्री मिळाल्यामुळे इतर पिकांऐवजी ते तेलबियांकडे वळतील. त्यामुळे तेलबिया पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होईल."

तांदळासाठी दोन हजारांहुन अधिकचा एमएसपी मिळाल्यामुळे तांदूळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तांदळावरील एमएसपीमुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील शेतकरी तांदूळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ करतील. तर दुसरीकडे कडधान्याच्या क्षेत्रात घट होईल. आणि तेलबियामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वाढ होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

एप्रिल २०२२ मध्ये महागाई १५.०८ टक्क्यांवर पोहचली आहे. गेल्या दीड वर्षातील हा महागाईचा उच्चांक असल्यामुळे पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करताना सावधपणे पाऊल टाकणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे तेलबिया, कडधान्ये, तृणधान्ये आणि कापूस या शेतमालाच्या एमएसपीमध्ये करण्यात आलेली वाढ तांदळापेक्षा अधिक आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेला एमएसपी शेतकऱ्यांना कमी पाण्यातील पीक घ्यायला प्रोत्साहन देईल, अशी माहिती ऍग्रो केम फेडरेशन ऑफ इंडियाचे कल्याण गोस्वामी यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एमएसपीमध्ये किमान १० टक्के वाढ करण्याची गरज होती. कारण वाढत्या महागाईमुळे शेती निविष्ठाच्या किंमती वाढल्याचे शेतकरी सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com