
Onion Market Update सध्या कांद्याचे दर (Onion Rate) पडल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. बाजारात कांद्याचा प्रचंड पुरवठा (Onion Supply) आहे. निर्यात आणि देशांतर्गत मागणी (Domestic Onion Demand) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कांद्यापेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे भाव कोसळले आहेत.
शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या तुलनेत सरासरी ५० टक्के तोटा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने खास बाब म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. त्यांच्या बॅँक खात्यावर तातडीने रोख रक्कम जमा करावी, असे मत शेतकरी आणि अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले, ‘‘कांद्याचे भाव उंच असतात तेव्हा स्टॉकबंदी, निर्यातबंदी इत्यादी उपाय योजले जातात.
म्हणून, उत्पादनवाढीच्या काळात भाव पडतात तेव्हा अर्थसाह्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तीन वर्षांपूर्वी अशा प्रकारचे थेट अर्थसाह्य कांदा उत्पादकांना देण्यात आले होते.''
आजच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल नेमकी किती मदत द्यावी, त्याचे निकष काय असावेत हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कृषी अर्थतज्ज्ञ आणि सरकारी यंत्रणांनी एकत्रित चर्चा करून ठरवावे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना कांदा पिकातून सातत्याने तोटा होत असल्यामुळे पुढील हंगामात शेतकरी कांद्याकडे पाठ फिरवण्याचा धोका आहे.
त्यामुळे २०२४ मध्ये ऐन निवडणुकीच्या वर्षात कांद्याचा पुरवठा कमी पडू शकतो; हे टाळण्यासआठी शेतकऱ्यांना थेट अर्थसाहाय्य करणे सरकारच्याही फायद्याचे ठरेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
एरवी कांद्याचे भाव पडले की केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी(PSF)'तून बाजारभावाने कांदा खरेदी करते. परंतु नंतर हाच कांदा बाजारात स्वस्तात विकला जातो. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे नाफेडच्या खरेदीपेक्षा थेट बॅंक खात्यावर पैसे जमा करावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.