
प्रस्थापित व्यवस्थेला वाटायचं की माणसे भुकेली (Hungry People) असतात म्हणून त्यांच्यात असंतोष आहे; म्हणून त्यांनी अर्धेमुर्धे का होईना रेशनिंग, डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर (Direct Benefit Transfer) (डीबीटी) आणि आता तर युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या (Universal Basic Income) बाता सुरू केल्या. पण माणसे म्हणाली, आम्ही राहू गरिबीत, पण तुमच्या पोटच्या मुलामुलींना जे शिक्षण, खेळण्याच्या संधी, मजा करायला मिळतात ते आमच्या पोटच्या मुलामुलींना देखील मिळाले पाहिजे. तुम्हाला जे स्वच्छ पाणी प्यायला मिळते, तसे आम्हाला मिळाले पाहिजे. कारण पाणी तर निसर्गाची, देवाची देणगी आहे.
आमच्या लहान मुलांना पोट भरण्यासाठी बाल कामगार म्हणून नोकरी करावी लागू नये. आम्ही म्हातारे झाल्यावर आमचे हातपाय चालेनासे झाल्यावर आम्हाला काम करावे लागू नये. आमच्यातील कोणी आजारी पडल्यावर त्याला नीट, परवडतील असे औषधोपचार आणि इतर सोयी मिळाव्यात.
लक्षात घ्या, कोणीही आम्ही घरात राहू, लोळत पडू, पण आम्हाला श्रीमंत व्यक्तीएवढे उत्पन्न मिळाले पाहिजे असे म्हणत नाही. तर माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भौतिक गोष्टींबद्दल त्यांच्या अपेक्षा आहेत. त्यासाठी प्रस्थापित / एलिट व्यक्तींनी काहीबाही थातुर, मातुर उपाय केले; ज्यातून पूर्वाश्रमीच्या वंचित घटकातून आलेल्या तुरळक व्यक्ती आता एलिट वर्गात दिसायला लागल्या.
त्यांचे प्रवक्तेपण करायला लागल्या. पण माणसे म्हणाली, आम्हाला फक्त वरील भौतिक गोष्टी हव्यात असे नाहीये. तर आम्हाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. आमचा आत्मसन्मान राखला गेला पाहिजे. ती दोन चार आमची माणसे तुमच्यात घेतलीत ते चांगले झाले; पण तुम्ही जे काही निर्णय घेता त्याच्या प्रक्रियेत आम्हाला देखील सामावून घ्या. आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी मान्यता दिली असेल पण निर्णय घेताना आमच्याशी सल्लामसलत करा, आमच्या सूचना विचारात घ्या, असे माणसे म्हणायला लागली.
हा सिलसिला पुढची अनेक दशके संपणारा नाही. भारतातल्या लोकशाहीत तर नाहीच नाही. प्रस्थापित / एलिट वर्गातील लोकांना हे कळत नाहीये की शेकडो कोटी माणसे त्यांच्या सारखीच लाखो वर्षाच्या जैविक उत्क्रांतीतून निपजली आहेत, शेकडो कोटी लोकांच्या आकांक्षा, त्यांच्या आत्मसन्मानाच्या कल्पना त्याच आहेत ज्या एलिट वर्गाच्या आहेत.
हजारो वर्षे जातिव्यवस्था आणि तत्सम जन्मजात पिरॅमिड होते तोपर्यंत ठीक होते. कॉर्पोरेट भांडवलशाहीने स्वतःच्या स्वार्थासाठी कोट्यवधी लोकांना त्यांच्या मुळापासून उखडले, शहरे वसवली, जाहिराती आणि तत्सम मार्गांनी कोट्यवधी लोकांच्या मनात उपभोगाची मनीषा जागवली. सारा तळ ढवळून काढला. घ्या आता आपल्या कर्माची फळे.
हे वेगळे आहे. एलिट / राज्यकर्त्या वर्गाच्या आकलनाच्या बाहेरचे आहे ते. पाण्याची पातळी एकच होईपर्यंत जसे पाणी अस्वस्थ राहते, वाहत राहते; तसे माणूस म्हणून असणाऱ्या अपेक्षा पुऱ्या होत नाहीत तोपर्यंत माणसे अस्वस्थ राहणार. त्यांच्या आकांक्षा दबा धरून राहणार. आधीच्या पिढ्या त्या अपूर्ण आकांक्षा डीनएमधून आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार. आणि मानवी समाज एलिट वर्गाला हवा तसा कधीही स्थिर होणार नाहीये. अजून शेकडो वर्षे.
(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून, टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.