
Cashew Market Update : काजू बीचे दर (Cashew Rate) वाढतील, असा बागायतदारांचा अंदाज होता. परंतु एप्रिल अखेरीसदेखील काजू बी दर प्रतिकिलो १०० ते १०५ वरच स्थिर राहिले आहेत. त्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हमी भाव आणि कर परतावा न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कोकणातील काजू उत्पादकाला यंदा दरातील घसरणीने आणखी धक्का दिला आहे. या हंगामात काजू बीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे चालू हंगमात बी साठवणूक करून ठेवलेल्या काजू उत्पादकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात साठ हजार हेक्टरवर काजू लागवड असून, जवळपास ५२ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. सुरुवातीला प्रतिकिलो ११५ रुपये दर होता. त्यामध्ये वाढ होऊन तो प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत पोहोचला. परंतु सध्या दर कमालीचा घसरला आहे. जिल्ह्यात काजू विक्री वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
कमी झाडे असलेले शेतकरी काजू बी काढल्यानंतर त्याच आठवड्यात त्याची विक्री करतात. मोठे शेतकरी मात्र काजू बी काढल्यानंतर ती साठवून ठेवतात. काजू बीचे दर वाढतील असा बागायतदारांचा अंदाज होता. परंतु एप्रिल अखेरीसदेखील काजू बीचा दर प्रतिकिलो १०० ते १०५ वरच अडखळले आहेत.
शेकडो किलो काजू बी अजूनही बागायतदारांच्या घरात पडून आहेत. त्यांची वेळेत विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांगला दर मिळत नसताना दुसरीकडे शासन काजू बीला हमी भाव देण्याची तयारी करीत आहे.
मात्र ती पुढच्या हंगामासाठी असणार आहे. त्यामुळे या वर्षी काजू बी ला दर न मिळाल्यास वर्षभर काजू बीच्या बेगमीत गुंतलेला बागायतदार कोलमडणार आहे. काजू बोंडावर प्रक्रिया करणारे उद्योग येथे नसल्याने काजू बीच्या व्यवसायावरच संपूर्ण हंगामाची मदार असते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.