
जळगाव ः निर्यातीच्या किंवा दर्जेदार केळीला राज्यात ३००० रुपये प्रति क्विंटलचा दर (Banana Rate) मिळत आहे. निर्यातीच्या केळी (Banana Export) दराने प्रथमच ३००० रुपयांचा टप्पा गाठला आहे. केळीचा तुटवडा वाढला असून, केळीचे आगार म्हणजेच खानदेशात थंडीमुळे काढणी (Banana Harvesting) लांबली आहे.
सध्या राज्यात सोलापूरमधील टेंभूर्णी भागातून ३० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) प्रतिदिन केळीची आवक सुरू आहे. तसेच आंध्र प्रदेशातून ३० कंटेनर प्रतिदिन केळीची काढणी होत आहे. तमिळनाडूमध्येही प्रतिदिन १५ ते १८ कंटेनर येत आहेत.
परंतु परदेशात केळीची जेवढी मागणी आहे, त्या तुलनेत ३० टक्केही पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. फिलिपिन्स, इक्वेडोर येथे केळीची आवक कमी आहे. या भागात पनामा रोगाची समस्या केळीत वारंवार येत आहे.
यामुळे तेथे उत्पादन कमी येत आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात तुटवडा आहे. देशातील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच इराण, बहरीन, दुबई येथे सध्या चांगली मागणी आहे. देशात रोज किमान ५०० कंटेनर केळीची मागणी आहे. पण १०० कंटेनर केळीही उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
थंडीमुळे जळगावात हंगाम लांबला
जळगावमधून निर्यातक्षम केळी कमी उपलब्ध होत आहेत. खानदेशात थंडी व चिलिंग इंज्युरीने अडचण येत असून, निर्यातक्षम केळी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. तीन कंटेनर रोज जळगावात उपलब्ध होत आहेत.
कमी दरांमुळे टाळली होती लागवड
खानदेशात मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मार्च व एप्रिलमधील लागवड टाळली होती. या कालावधीत लागवड केलेली केळी जानेवारी व फेब्रुवारीत काढणीवर यायची. मागील वर्षी या कालावधीत केळीला ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर होता.
यामुळे शेतकऱ्यांनी लागवड टाळली. परिणामी, सध्या खानदेशात केळीचा तुटवडा आहे. खानदेशातून फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला निर्यातक्षम केळी काढणीवर येईल. या काळात रोज १५ ते १८ कंटेनर केळी काढणी एकट्या जळगाव जिल्ह्यात होईल, असे चित्र आहे.
स्थानिक मागणी कमी
सध्या उत्तर भारतात थंडीमुळे केळीला मागणी कमी आहे. वर्षभरात डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या काळात सर्वांत कमी दर केळीला मिळतात. मागील १० वर्षे अशीच स्थिती राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मार्च व एप्रिलमधील केळी लागवड टाळली आहे.
परंतु यंदा या कालावधीत लागवडीच्या केळीला मोठी मागणी व विक्रमी दर आहेत. परंतु अत्यल्प केळी उत्पादकांना या विक्रमी दरांचा लाभ राज्यात होत आहे.
कारण सोलापूर जिल्ह्यात सहा ते सात हजार हेक्टर केळी लागवड आहे. तुलनेत हे क्षेत्र कमी आहे. सोलापुरात वर्षभर केळी लागवड सुरू असते. यामुळे या भागात केळीची आवक सध्या होत आहे.
देशात सध्या निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा आहे. यामुळे दर विक्रमी स्थितीत पोहोचले आहेत. आखाती देशांत केळीला मोठा उठाव आहे. कंटेनरचा तुटवडा व अधिक भाडे आदी समस्या दूर झाल्या आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवणुकीसाठी देशात रोज ५०० कंटेनर निर्यातक्षम केळीची मागणी आहे. परंतु रोज १०० कंटेनर केळीदेखील उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
- प्रेमानंद महाजन, केळी व्यापार विषयाचे जाणकार, जळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.