
Soybean Market Update पुणे : देशातील सोयाबीन उत्पादक (Soybean Farmer) शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सोयाबीन दरात (Soybean Rate) प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी सुधारणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
केंद्र सरकार खाद्यतेल आयातीवरील (Edible Oil Import) शुल्क वाढविण्याची शक्यता आहे. तसेच जगातील प्रमुख खाद्यतेल निर्यातदार (Edible Oil Export) असलेला इंडोनेशिया निर्यातीवर काही प्रमाणात बंधने आणण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारात सोयापेंड तेजीत आहे. त्यामुळे भारतातील सोयापेंडला मागणी वाढली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत सोयापेंड निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल, असे बाजार अभ्यासकांनी सांगितले.
तसेच सोयापेंडची देशांतर्गत मागणीही चांगली आहे. पोल्ट्री उद्योगाकडून मजबूत मागणी असल्यामुळे दर चढे राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. सोयापेंडमधील दरवाढीचा फायदा सोयाबीनला मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासून सोयाबीन दरात सुधारणा होत आहे.
यापुढील काळात हा कल कायम राहण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सोयाबीन दरवाढीला अनुकूल असूनही दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
देशातील सोयाबीन प्रक्रिया आणि व्यापार क्षेत्रातील काही घटकांनी संगनमत करून खेळी केल्याचा हा परिणाम आहे. परंतु आता ही स्थिती बदलत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे चित्र आहे. तसेच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या भाव दाबून ठेवणे आता जास्त दिवस शक्य नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
खाद्यतेल आयातीचा फटका
केंद्र सरकारने महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत खाद्यतेलाची बेसुमार आयात केली. त्यामुळे पुरवठा वाढून खाद्यतेलाचे दर घटले. त्याचा थेट फटका सोयाबीनला बसला.
या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रानेही खाद्यतेल आयातीवर शुल्क वाढवण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच राजस्थान, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.
तेथील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी सरकार लवकरच आयातशुल्क वाढवण्याचा निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितले.
इंडोनेशियातील घडामोडी महत्त्वाच्या
इंडोनेशियामध्ये रमजान तोंडावर असताना खाद्यतेलाचे दर भडकले आहेत. त्यामुळे इंडोनेशिया सरकार खाद्यतेल निर्यातीवर काही बंधने आणण्याच्या विचारात आहे. त्याचा परिणाम भारताच्या खाद्यतेल आयातीवर होईल.
अर्थात, देशात खाद्यतेलाचा मुबलक साठा असल्यामुळे टंचाई भासणार नाही, पण आयात कमी झाल्याचा फायदा सोयाबीनला मिळू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.