
Cotton Futures Market अकोला ः ‘‘कापूस या एका पिकाचा वायदा बाजार (Cotton Futures Market) सुरू झाल्याने शेतकरी समाधानी नाहीत. सर्व शेतीमालाचे वायदे बाजार सुरू करावेत, यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहे.
अर्थसंकल्पीय (Union Budget) सत्र संपेपर्यंत खासदारांनी याबाबत आपापली भूमिका स्पष्ट करावी. सर्व खासदारांनी शेतीमालाच्या वायदे बाजारातील सरकारी हस्तक्षेप थांबविण्याबाबत पंतप्रधानांच्या नावाने पत्रे द्यावीत.
अन्यथा, खासदारांच्या घरासमोर धरणे देण्यात येतील,’’ असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी दिला.
शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी संघटनेच्या विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना बहाळे, विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, माजी जिल्हाप्रमुख अविनाश पाटील-नाकट, अकोला तालुका प्रमुख बळिराम पांडव उपस्थित होते.
बहाळे म्हणाले, ‘‘आपल्या देशात निर्यात कमी व आयात अधिक आहे. त्यामुळे आर्थिक व रोजगारासंबंधीचे प्रश्न निर्माण होत आहेत. शेतीमाल बाजाराच्या निर्बंध मुक्तीमध्ये या प्रश्नांची उत्तरे आहेत. शेतीमालाच्या बाजारातील सर्व सरकारी हस्तक्षेप थांबवावा, तरच शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे येतील.
त्यातून रोजगार निर्मिती होईल. सेबी व वायदे बाजारासंबंधी सर्व समित्यांवर शेतकऱ्यांना इतर व्यवसायिकांच्या, उद्योगांच्या तुलनेत योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, सेबी कायद्यातील कलम १६ रद्द करावे, अशा आशयाची पत्रे खासदारांनी पंतप्रधानांच्या नावाने द्यावीत. या बाबत तसा आग्रह सरकारकडे धरावा.’’
‘‘मागण्या मान्य झाल्यास बाजारातील अतिरिक्त हस्तक्षेप थांबेल व शेतकऱ्यांकडे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील,’’ असा विश्वास बहाळे यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.