
नाशिक : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nampur APMC) जयपूर येथील कांदा व्यापारी किशन अगरवाल हे २०१७ पासून कांद्याचे व्यवहार (Onion Market) करत आहे. असे असताना ते लिलावात सहभागी होताच स्थानिक व्यापाऱ्यांनी बुधवार (ता. २५) रोजी चालु लिलावातून ‘वॉक आउट’ केला.
त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ केला. अखेर अगरवाल यांचे खरेदी करणारे प्रतिनिधी निघून गेल्यानंतर पुन्हा लिलाव झाले. त्यामुळे येथे व्यापारी मनमानी करत असल्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळीनंतर कांदा दरात घसरण होत असताना अगरवाल हे कांदा खरेदीसाठी आले नव्हते ते तेजीच्या काळातच फक्त कांदा साठवणूक करणेकामी खरेदीसाठी येतात, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र ‘‘मी वार्षिक सात कोटी रुपयांपर्यंत कांद्याची खरेदी करतो, माझे प्रतिनिधी बाजार समितीच्या परवानगीने या ठिकाणी खरेदी करतात. कोरोनाच्या काळातही खरेदी केली, असे असतानाही स्थानिक व्यापारी माझी अडवणूक करत’’ असल्याच आरोप अगरवाल यांनी केला आहे.
बाजार समितीमध्ये अद्याप नोंदणीकृत व्यापारी संघटना नसतानाही व्यापारी कांदा लिलाव बंद पाडून बाजार समिती व्यवस्थापनास कोंडीत आणत असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आहे.
बाजार समितीने अग्रवाल यांना ५ जानेवारीनंतर कांदा खरेदीस प्रतिबंध केला होता. यावर त्यांनी पणन संचालनालयाकडे अपील केले. त्यावेळी पणन संचालक विनायक कोकरे यांनी बाजार समितीचा निर्णयास कांदा खरेदीस प्रतिबंध केल्यानंतर स्थगिती दिली.
त्यांनतर बुधवार (ता. २५) रोजी अगरवाल यांनी देत लिलावात सहभाग घेण्यासाठी पत्र दिले. यावर त्यांचे कर्मचारी लिलावात सहभागी होण्यासाठी गेले असताना व्यापाऱ्यांनी चालु लिलावातून काढता पाय घेतला. त्यामुळे लिलाव बंद राहिले.
त्यामुळे पणनचे आदेश असतानाही व्यापारी निघून गेले. मात्र बाजार समिती याप्रकरणी कार्यवाही करत नसून एकतर्फी भूमिका घेत असल्याचा आरोप अगरवाल यांनी केला आहे.
याबाबत काही स्थानिक व्यापाऱ्यांना संपर्क साधला असता ‘‘कृपया आमचे नाव वापरू नका आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही’’असे म्हणत अधिकचे बोलणे टाळले.
व्यापारी अगरवाल यांना वेळोवेळी बैठकीला पत्र देऊनही ते प्रत्यक्ष उपस्थित राहत नाही. मंदीच्या काळात खरेदीसाठी येत नाही. फक्त तेजीच्या काळात खरेदी करतात.त्याच्या अशा पद्धतीमुळे व्यापारी लिलावातून बाहेर जातात. आवक वाढत असताना त्यांनी नियमित अधिक खरेदी करावी, त्यातून हा वाद मिटेल. अन्यथा अशा मनमर्जीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. इतर प्रतिनिधींच्या माध्यमातून किरकोळ खरेदी न करता त्यांनी स्वतः येऊन खरेदी करावी. बाजार समितीच्या वेळोवेळी सूचनांचे पालन करावे. संबंधित व्यापारी व स्थानिक व्यापारी यांच्यातील हा वाद आहे.
-कृष्णा भामरे, सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, नामपूर (ता.सटाणा)
पणनने बाजार समितीच्या पत्रास स्थगिती दिल्यानंतर लिलावात सहभागी होण्यासाठी माझे प्रतिनिधी गेले. मात्र त्यांना पाहून व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेतला. तसेच बाजार समिती २६ जानेवारी रोजी बंद असताना मला मेलवर २८ तारखेच्या बैठकीला येण्याचे कळवले आहे. एवढ्या कमी वेळात जयपूर येथून बैठकीसाठी येऊ शकत नाही. सुट्टीच्या दिवशी पत्र काढले जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
-किशन अगरवाल, कांदा व्यापारी-केआरसी जयपूर कमिशन एजंट
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.