
चीनला सोयाबीन निर्यातीची शक्यता
चीनकडून यंदा भारतीय सोयाबीनला (Soybean) मागणी येण्याची शक्यता काही जाणकार व्यक्त करत आहेत. एप्रिल महिन्यात चीनमध्ये सोयाबीन गाळप मार्जिन उणे झाल्यानं अनेक प्लांट्स बंद झाले होते. मात्र आता येथील वराहपालन व्यवसायातून सोयापेंडला (SoyaCake) मागणी वाढलीये. त्यामुळं प्रक्रिया प्लांट्स पुन्हा सुरु झाले असून त्यांनी अमेरिका (America) आणि इतर देशांतून सोयाबीन खरेदी सुरु केलीये. त्यामुळं चीन १० वर्षांनंतर भारताकडून सोयाबीन घेण्याची शक्यता निर्माण झाली. चीननं खरेदी सरु केल्यास भारतातील सोयाबीनलाही आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशात यंदा सोयाबीनला सरासरी किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज आहे.
वांगी दरातील तेजी कायम
बाजारात सध्या वांगी भाव खात आहेत. बाजारातील वांगी आवक सध्या कमी झालीये.पुणे, नागपूर आणि मुंबई या बाजारांमधील आवक ३०० क्विंटलपेक्षा जास्त होतेय. मात्र इतर बाजारातील आवक ही ५० क्विंटलपेक्षा कमी होतेय. त्यामुळं वांगी दरही तेजीत आहेत. सध्या राज्यातील बाजारांमध्ये वांग्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काही आठवडे वांगी दर टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
उडीद यंदा भाव खाणार
देशात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. त्यातच यंदा खरिपातील उडदाची लागवड चार टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळं पुढील काळातही उडदाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. उडदाची आयातही यंदा कमी झालेली दिसतेय. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १ लाख ३० हजार टन आयात झाली. तर मागील हंगामात याच काळातील आयात जवळपास दोन लाख टनांवर पोचली होती. त्यामुळं सध्या बाजारात उडदाला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. यंदा उडदाचे दर तेजीतच राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगातून व्यक्त केला जातोय.
भेंडीचे दर टिकून राहणार
भेंडीची आवक कमी असल्यानं बाजारात सध्या चांगला दर मिळतोय. राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या वगळता आवक ३० क्विंटलपेक्षा कमी होतेय. मात्र नवरात्रीमुळं भेंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळं भेंडीच्या दरातही वाढ झालीये. राज्यातील बाजारात सध्या भेंडीला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. भेंडीचा हा दर पुढील आठवडाभर टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी केला आहे.
निर्यातबंदीनंतही गहू दर बेलगाम
सध्या गव्हाच्या दरात पुन्हा तेजी आलीये. देशातील गव्हाचं उत्पादन यंदा घटलं. त्यातच गहू निर्यात जास्त झाली. त्यामुळं दरही तेजीत आले होते. दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं गहू निर्यातबंदी केली. त्यानंतर गहू पीठ आणि रव्याच्या निर्यातीवरही निर्बंध लादले. निर्यातबंदी केल्यानं गव्हाचे दर कमी होतील, असा विश्वास सरकारला होता. तसचं देशात गहू उत्पादन कमी झालं तरी खरिपात तांदूळ उत्पादन वाढेल, अशी आशा होती. त्यामुळं सरकारनं कल्याणकारी योजनांमधून गव्हाऐवजी तांदळाचं वितरण वाढवलं. मात्र जून महिन्यापासूनच पावसाचं प्रमाण महत्वाच्या भात उत्पादक पट्ट्यात कमी राहीलं. ही तूट पुढील दोन महिने कायम राहिली. त्यामुळं खरिपातील भात लागवड जवळपास १९ टक्क्यांनी घटली, तर उत्पादन १०० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. तांदूळ उत्पादनात घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर गव्हाच्या दरात पुन्हा वाढ होत गेली. अनेक बाजारांमध्ये गव्हाने पुन्हा २५०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठलाय. जवळपास सर्वच राज्यांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे जर वाढले आहेत. गुजरातमध्ये गव्हाच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली. मध्य प्रदेशात मागील महिनाभरात ७० रुपयांनी दर वाढले. तर राजस्थानमध्ये ३० रुपये आणि उत्तर प्रदेशात ५० रुपयांची दरात सुधारणा झाली. रब्बीतील गहू हाती येईपर्यंत गव्हाचा तुटवडा भासून दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.