
Cotton News : पुणेः यंदा शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस मागं ठेवला. कापूस बाजारात सध्या मोठे चढ उतार सुरु आहेत. आज देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात नरमाई दिसून आली.
यंदा देशातील कापूस पुरवठा आणि वापर यात जास्त फरक नाही. त्यामुळं कापासचे भाव चांगले राहतील, असा अंदाज होता. पण सध्या दर दबावात आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची उद्योगांची मानसिकता नसल्याची टीका शेतकरी करत आहेत.
देशातील कापूस उत्पादन यंदाही घटल्याचं आता सर्वच जण मान्य करत आहेत. सीएआयनं ३२१ लाख गाठींचा अंदाज जाहीर केला.
तर द नॅशनल काॅटन ब्रोकर्स असोसिएशननंही उत्पादन ३२२ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला.
तसचं या संस्थांचे अंदाज यापुढेही कमी होऊ शकतात. पण त्यासाठी कदाचित मार्च किंवा एप्रिल उजाडेल. हे अंदाज मुख्यतः शेतकऱ्यांनी बाजारात किती कापूस विकला, यावर अवलंबून असतात.
बाजारातील आवकेची सरासरी काढून उत्पादनाचे अंदाज दिले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर अंतिम अंदाज दिला जातो.
त्यामुळं दरवर्षी शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर उत्पादन घटल्याचं सांगितलं जातं. सहाजिकच उत्पादन घटल्यामुळं दरात तेजी येते. पण त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यंदा मात्र शेतकरीही दरवाढीसाठी थांबले आहेत.
शेतकऱ्यांनी बाजारावर कापूस विक्रीचा दबाव येऊ दिला नाही. पण तरीही कापूस दरात वाढ नाही. कापसाचा ताळेबंद पाहिल्यास दरवाढ व्हायला पाहीजे. कारण यंदा उत्पादन, आयात आणि मागील हंगामातील शिल्लक पकडून ३६५ लाख गाठी कापूस पुरवठा होणार.
तर देशातील वापर आणि निर्यात मिळून ३३० लाख गाठी वापर होणार. पुढील हंगामासाठी ३५ लाख गाठी कापूस जाऊ शकतो. त्याचं ओझं बाजारावर नसेल.
दरावाढीला पोषक स्थिती
कापसाचा ताळेबंद पाहिल्यास कापूस भाव वाढायला हवेत. पण बाजार दबावात ठेवला जातो. कृत्रिम मंदीही आणली जाते.
आता मार्च महिन्यात शेतकरी थांबणार नाहीत, त्यामुळं कापूस विक्री वाढेल, परिणामी दर दबावात येतील, अशी चर्चा सुरु आहे.
पण मार्च महिन्यात अपेक्षित दर मिळाला तरच कापूस विकू, असं अनेक शेतकरी सांगत आहेत. तर आर्थिक गरज असलेल्यामुळं सध्याही कापूस विक्री सुरुच आहे.
त्यामुळं मार्च महिन्यात वेगळं काही घडणार नाही, असंही शेतकऱ्यांनी सांगितलं.
दरावर दबाव येणार नाही
आज कापूस दर क्विंटलमागं २०० रुपयांनी नरमले होते. कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
तर वायद्यांमध्येही नरमाई दिसून आली. सध्या उद्योगांच्या अपेक्षेपेक्षा बाजारात कमी आवक आहे. त्यामुळं कापूस दरात जास्त नरमाईची शक्यता नाही.
तसचं कमी झालेल्या दरावर कापूस जास्त दिवस राहणार नाही. दरात सुधारणा होऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्यानं कापूस विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.