Tur market
Tur marketAgrowon

Tur Market : तूर यंदा शेतकऱ्यांना आधार देणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या हाती आता चालू हंगामातील तूर येत आहे. पुढील महिनाभरात तुरीची आवक बाजारात वाढेल. सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला अनेक बाजारांमध्ये प्रति क्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहेत. मात्र्पर दराचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.

जागतिक पातळीवर कडधान्यांमध्ये (Tur) तूर सहाव्या क्रमांकाचे मुख्य पीक आहे. जगात ८२ देशांमध्ये तुरीचे उत्पादन (Tur Production) होते. या देशांमध्ये मिळून तुरीचा पेरा ७० लाख हेक्टरच्या दरम्यान राहतो.

सन २०२२ मध्ये जगात जवळपास ६८ लाख हेक्टरवर तुरीची लागवड (Tur Cultivation) झाल्याचा अंदाज आहे. तर उत्पादन ५५ ते ५८ लाख टनांपर्यंत पोहचू शकते, असा अंदाज आहे. भारत जागतिक पातळीवर सर्वात मोठा तूर लागवड आणि उत्पादन करणारा देश आहे.

Tur market
Tur Rate: आज तुरीचे दर वाढले का कमी झाले?

पीकनिहाय कडधान्यातील वाटा (टक्क्यांत)

बीन्स…३१ टक्के.

वाटणावर्गीय…१७ टक्के.

हरभरा…१५ टक्के.

मसूर…८ टक्के.

तूर….७ टक्के.

जागतिक तूर लागवडीत भाराताचा वाटा जवळपास ७२ टक्के आहे. तर आफ्रिकेतील मालावी, केनिया, युगांडा, मोझांबिक आणि टांझानिया या देशांत जवळपास १० लाख हेक्टरवर तूर उत्पादन होते. या देशांमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जाते.

तर भारतात कडधान्यामंधील तूर हे महत्वाचे पीक आहे. तुरीची आयातही मोठ्या प्रमाणात होते. तुरीखालील क्षेत्रही मोठे म्हणजे सरासरी क्षेत्र ४५ लाख हेक्टर आहे. गेल्या हंगामात ४८ लाख हेक्टरवर तर यंदा लागवड ४५ लाख हेक्टरवर पोचली.

मागील हंगामात वर्षभर तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. तो ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल होता. तर बाजारातील मिळणार दर सहाहजार रुपये होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास पाच टक्क्यांनी कमी केली.

देशातील वर्षनिहाय तूर लागवड आणि उत्पादन (क्षेत्र लाख हेक्टर) (उत्पादन लाख टन)

वर्ष…लागवड…उत्पादन

२०१६-१७…५२…४८.७

२०१७-१८…४५…४२.९

२०१८-१९…४५…३३.२

२०१९-२०…४७…३८.९

२०२०-२१…४५…४३.२

२०२१-२२…४९…४३.५

२०२२…४८…३९*

Tur market
Tur Rate: तुरीला आज राज्यात काय भाव मिळाला?

भारताचा वापर

जागतिक पातळीवर दरवर्षी जवळपास ५५ ते ६० लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होते. त्यापैकी भारतातच तब्बल ४५ लाख टनांचा वापर होतो. यावरून जागतिक पातळीवर तूर वापरातील भारताचे महत्व लक्षात येते. भारत जागतिक तूर उत्पादनापैकी ८६ टक्के वापर करतो.

त्यामुळे अन्य देशांमध्येही भारताला निर्यात करण्यासाठीच तुरीचे उत्पादन घेतले जाते. मुख्यतः म्यानमारसह आफ्रिकेतील मालावी, केनिया, युगांडा, मोझांबिक आणि टंझानिया या देशांमध्ये भारताची मागणी लक्षात घेऊनच लागवड केली जाते.

Tur market
Tur Rate : राज्यात आज तुरीला काय दर मिळाला?

भारतासाठी आयातीचे स्त्रोत

भारत तुरीची आयात करणार महत्वाचा देश आहे. भारतात आयात होणाऱ्या तुरीमध्ये जवळपास ६० टक्के वाटा म्यानमारचा आहे. तर मोझांबिक जवळपास २१ टक्के तूर भारताला पुरवतो. तर सुदानमधून ११ टक्के, टांझानियातून ४ टक्के आणि मालावीतून ३ टक्के तूर भारताला पुरविली जाते.

विशेष म्हणजे या देशांमध्ये तुरीचा वापर नगण्यच आहे. हे देश केवळ निर्यातीसाठी तूर लागवड करतात. मागील काही वर्षांत भारताची मागणी अधिक होती. मात्र या देशांमध्ये तुरीची उपलब्धता कमी होती.

त्यामुळे भारताला आवश्यक माल उपलब्ध झाला नाही. त्यामुळे भारताने या देशांबरोबर तूर आयातीचे करार केले. म्हणजेच येथील शेतकऱ्यांना तूर खरेदीची हमी दिली. त्यामुळे येथे लागवड वाढली आणि पुरवठाही वाढत आहे. चीननेही या देशांमधून मुगाची खरेदी वाढविली आहे.

आयातीचे मुक्त धोरण

भारतात गरजेऐवढे तूर उत्पादन होते. एखाद्या वर्षी उत्पादन कमी झाले तरी नाफेडकडे साठा असतोच. मात्र दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आयात करते. तुरीचे दर मागील दशकभरात महागाईच्या तुलनेत कमीच वाढले. तरीही सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात तूर आयात करते.

सन २०२० पर्यंत सरकार दरवर्षी तूर आयातीसाठी कोटा पद्धतीचा अवलंब करत होते. ठरवून दिलेला कोटा आयात होत होता. सन २०१९-२० मध्ये सर्वाधिक चार लाख ५० हजार टन तूर आयात झाली होती. तर सर्वांत कमी आयात २०१७-१८ मध्ये एक लाख ८६ हजार टन तूर देशात आयात झाली.

मात्र २०२१-२२ पासून सरकारने कोटा पध्दत बंद करून मुक्त तूर आयातीचे धोरण सुरु केले. त्यामुळे मागील हंगामात ८ लाख ६० हजार टन तूर आयात झाली. सरकारने आयातीसाठी रान मोकळे केले. यंदाही गेल्यावर्षीऐवढी तूर आयात होऊ शकते. यंदा भारतात ९ लाख टनांपर्यंत तूर आयात होऊ शकते, असा अंदाज आहे

देशाची वर्षनिहाय तूर आयात (लाख टनांत)

वर्ष…आयात

२०१६-१७…२.३२

२०१७-१८…१.८६

२०१८-१९…२.१८

२०१९-२०…४.५०

२०२०-२१…४.४३

२०२१-२२…८.६०

२०२२-२३…९*

(*२०२२-२३ मधील आयातीचा अंदाज)

यंदा उत्पादनाचा अंदाज काय?

देशात तूर लागवड यंदा घटली. देशातील तूर लागवड क्षेत्र यंदा पाच टक्क्यांनी कमी झाले. तसेच सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाला फटका बसला. मागील काही वर्षांपासून शेंगा भरणीच्या काळात पाऊस, बदलते वातावरण आदी कारणांमुळे उत्पादन कमी राहिले. मात्र यंदा सप्टेंबर महिन्यात सलग ८ ते १० दिवस पाऊस झाला. तर ऑक्टोबर महिन्यातही हीच स्थिही होती.

तसेच नोव्हेंबर महिन्यात सलग १५ ते २० दिवस पाऊस झाला. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. यंदा लागवड कमी झाली म्हटल्यावर सरकारने उत्पादनाचा अंदाजही घटवला. सरकाच्या अंदाजानुसार यंदा देशात ३९ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.

मात्र तूर पिकावरील संकटांची मालिका संपली नाही. पिकावरील मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि वाढलेल्या किमान तापमानाचा उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमी राहिल असे अंदाज उद्योग आणि व्यापारी जगतातून व्यक्त होत आहेत.

उद्योगाच्या मते यंदा देशातील तूर उत्पादन ३२ ते ३५ लाख टनांपेक्षा जास्त नसेल. तर बाजारातील अभ्यासकांच्या मते यंदा ३० लाख टनांच्या दरम्यान उत्पादन स्थिरावेल. म्हणजेच सरकारसह सर्वांनी यंदा तूर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यंदा काय परिस्थिती राहू शकते?

यंदा देशातील तूर लागवड कमी झाली. तसेच पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनातील घट वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या तुरीच्या दरात तेजी आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. यंदा सरकार तूर आयात वाढविण्याचीही शक्यता आहे. मात्र जागतिक पातळीवर तूर उत्पादनाची स्थिती पाहता यंदा सरकारला नऊ लाख टनांच्या दरम्यान तूर आयात करता येऊ शकते.

तर देशातील उत्पादन ३५ लाख टनांपर्यंत होऊ शकते. म्हणजेच यंदा देशातील तूर पुरवठा ४४ लाख टनांपेक्षा जास्त होणार नाही. तर मागील हंगामातील तूर कमीच शिल्लक आहे. त्यामुळे यंदा देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त होण्याची शक्यता कमीत आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांकडील तूर बाजारात येण्याच्या काळातही चांगले राहू शकतात. बाजारात तुरीची आवक दाटल्यानंतर दर काहीसे दबावात येतील.

मात्र शेतकऱ्यांनी तुरीची विक्री सोयाबीन आणि कापसाप्रमाणे बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने केल्यास चांगला दर मिळू शकतो. आवकेचा दबाव असलेल्या काळात खुल्या बाजारातही हमीभाव मिळण्याची शक्यता सध्या दिसत आहे.

यंदा सरकारने तुरीला ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारातील आवक मर्यादीत झाल्यास दर ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सरकारच्या धोरणांकडे लक्ष आवश्क

मागील हंगामातही देशातील तूर उत्पादन घटले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण मागीलवर्षापर्यंत तुरीची सरासरी आयात ४ लाख ५० हजार टनांपर्यंत होती. मात्र देशातील उत्पादन घटले दर वाढीची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबवले. आक्रमकपणे तूर आयात केली. त्यामुळे मागील वर्षात विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली.

म्हणजेच अंदापेक्षा दुप्पट तूर देशात आणली. त्यामुळे बाजारातील गणितच बिघडले. पुरवठा वाढला आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले. यंदाही देशातील तूर उत्पादन घटणार आहे. सरकारच्या आयातीवरही मर्यादा असतील. म्हणजेच सरकारला ९ ते १० लाख टनांपेक्षा जास्त आयात करता येणार नाही.

त्यामुळे सरकार ‘स्टाॅक लिमिट’र, साठ्याची माहिती आदी निर्णय घेऊन बाजारावर मानसिक दबाव आणू शकते. त्यामुळे शेतकरी म्हणून सरकारला या निर्णयाकडे लक्ष असणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या काळात असे निर्णय घेतल्यास त्यास शेतकऱ्यांनी विरोध करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com