जळगाव ः जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू झालेली शेत ‘पाणंद रस्ते’ योजना राज्य पातळीवर ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते’ या नावाने सुरू झाली आहे. त्या योजनेचा पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला असून यात जळगाव जिल्ह्यातील ६५ किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातल्या शिवारातील रस्ते हे इतिहासात पहिल्यांदाच जोडले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. या अंतर्गत एक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत होता. तिच्या मदतीने रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. योजना अतिशय यशस्वी ठरल्याने राज्य पातळीवर याचे कौतुक करण्यात आले. राज्य सरकारने ही योजना मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना या नावाने राबवण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी मातोश्री ग्रामसमृद्धी योजना कार्यान्वित करण्यात आली. योजनेतून रस्ते मजबूत नव्हे तर डांबरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला. एका किलोमीटरसाठी तब्बल २३ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शासनस्तरावरून या योजनेचा कामांना मंजुरी द्यायला सुरवात करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ६५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तालुक्यात होणार ‘शेतरस्ते’ अमळनेर तालुक्यातील २० किलोमीटरचे रस्ते, मुक्ताईनगर तालुक्यातील १६ किलोमीटर, जळगाव तालुक्यातील ११, धरणगाव १५, पारोळा ३ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. दरम्यान मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोजगार हमी योजना यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे .
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.