
जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण १५ टक्केही झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वितरणात हात आखडता घेत आहेत. पीक कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. पण बँकांमध्ये कुणी दखल घेत नाही. सर्व कागदपत्र शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. पण व्यवस्थापक, बँकेचे शेती अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. खानदेशात सुमारे ६०० कोटी रुपये पीक कर्ज रब्बी हंगामात शेतकऱ्यांना देण्याचा लक्ष्यांक प्रशासनाने निश्चित केला आहे. परंतु हा लक्ष्यांक १५ टक्केही पूर्ण झालेला नाही. जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँकेने रब्बी पीक कर्जाचे प्रस्ताव मार्गी लावले आहेत. पण या बँकेकडे रब्बीसंबंधी पीक कर्ज मागणीचे प्रस्ताव कमी होते. पण राष्ट्रीयीकृत बँकांकडे पपई, केळी व इतर निमबागायती पिकांसाठी पीक कर्ज मागणीचे प्रस्ताव सादर झाले आहेत. पण ते निकाली काढलेले नाहीत. काही बँकांच्या शाखा आता कोविडचे कारण पुढे करीत आहेत. नंदुरबार व धुळ्यात जिल्हा बँकेला पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक दिलेला नाही. या भागात राष्ट्रीयीकृत बँकांनाच पीक कर्ज वितरित करायचे आहे. अग्रणी बँकांसोबत जळगाव व धुळ्यात नुकत्याच बैठका जिल्हा प्रशासनाने घेतल्या आहेत. या बँकांना वार्षिक वित्तपुरवठा आराखडा व त्याबाबतच्या सूचना पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकांनंतर काही बँकांनी पीक कर्जाचे प्रस्ताव मार्गी लावले. पण जळगाव व धुळ्यात मिळून सुमारे चार हजार प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली आहे. या शेतकऱ्यांना सिबिलचे कारण सांगून पीक कर्ज नाकारले जात आहे. काही शेतकऱ्यांना जमीन मूल्यांकन पत्रासाठी पीक कर्ज दिले जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.