
वाशीम ः जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सर्व संबंधित यंत्रणांनी या निधीतून कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील कामे विहित मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ चा आढावा आयोजित सभेत घेताना पालकमंत्री बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री देसाई पुढे म्हणाले, ‘‘मुदतीत कामे करताना निविदा प्रक्रिया सुद्धा वेळेत झाल्या पाहिजे. सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता देखील वेळेत घेतल्या पाहिजे. कामे गुणवत्तापूर्ण झाली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. कामाच्या सुरुवातीचे आणि काम पूर्ण झाल्याचे फोटो सादर करावे. जून आणि जुलै महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. सन २०२१-२२ या वर्षासाठी १८५ कोटी रुपये निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सर्व निधी हा ३१ मार्च २०२२ पूर्वी खर्च करावा. निधी समर्पित करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती या मॉडेल स्वरूपात उभाराव्यात. शाळेचा परिसर रमणीय असावा असे नियोजन करावे,’’ असे त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.