
वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व पांढराटाका रोगामुळे सलग दोन वर्ष भाताचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले. यावर गेल्यावर्षी मोजक्या गावातील २ ते ५ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पीक पाहणीसाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाहीत. ९५ टक्के शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात भात हे मुख्य पीक घेतले जाते. चालूवर्षी भरपाईबाबत विमा कंपनी काहीही बोलायला तयार नाही. एरव्ही मतांसाठी नागरिकांना दंडवत घालणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. मागील व चालू वर्षी परतीच्या पावसाने ऐन भात सोंगणीवेळी थैमान घातले. पाच वर्षापासून पाऊस अनियमित पडतो. लागवडी दरम्यान पाऊस दडी मारतो, मात्र भात पक्वतेच्या अवस्थेत धो धो पडतो. परिणामी तयार झालेल्या पिकाचे नुकसान करतो. नेहमी होणाऱ्या नुकसानीला आधार मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पीक कर्ज वाढवून ‘भारत एक्सा’ या विमा कंपनीकडून पीक विमा घेतला. कंपनीने विमा घेतला तेव्हा कोणतेही मार्गदर्शन सूचना केल्या नाहीत. तालुक्यातील ७५ टक्के शेतकरी संगणक साक्षर नाहीत, त्यामुळे व विमा कंपनीने माहिती न दिल्यामुळे मुदतीत दावा दाखल केला नाही. विमा कंपनीचा प्रतिसाद नाही विमा कंपनीने दिललेल्या टोल फ्री नंबरवर तक्रार केली. इ- मेलवर नुकसान झालेल्या पिकांचे फोटो पाठवले. त्यावर विमा कंपनीने आमचे प्रतिनिधी येतील, ते नुकसानीची पाहणी करतील, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात कोणीही आले नाही. शेवटी पीक किती दिवस शेतात ठेवणार, शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला, तक्रारी दाखल केल्या, परंतु विमा कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे संप्तत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी व यावर्षी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाईच्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी. -पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती,इगतपुरी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.