धुळे : कृषी विद्यापीठ व खासगी उद्योजकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण कृषी यंत्र व अवजारांच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेशासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी यांनी केले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांद्वारे विविध प्रकारची नावीन्यपूर्ण अवजारे विकसित केली आहेत. ही अवजारे विद्यापीठस्तरावर व्यावसायिक उत्पादनाच्या मर्यादा लक्षात घेता त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही. तसेच खासगी उत्पादकांनी अनेक नावीन्यपूर्ण यंत्र व अवजारे विकसित केलेली आहेत. मात्र त्यांचा योजनेत समावेश नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी विद्यापीठांद्वारे विकसित नवीन यंत्रे, अवजारांच्या उत्पादनासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणे आणि या अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेशाबाबतची प्रक्रिया विहित करण्याचा, तसेच खासगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण यंत्र, अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी योजनेत समावेशबाबातची प्रक्रिया विहित करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. या कृषी यंत्रे व अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेशासाठी अशा उत्पादकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती प्रस्ताव मागवीत आहेत. अशा उत्पादकांची राज्यस्तरीय नोंदणी प्रक्रिया राबविण्याबाबतची कार्यपद्धती, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आदींचा तपशील http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांनी नोंदणीसाठीचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.