राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल

केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे.
e-nam
e-nam

पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तर कोरोना संकटात मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सुमारे २७५ कोटींची उलाढाल झाली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील समाविष्ट झालेल्या ५८ बाजार समित्यांचे कामकाज जुलैमध्ये सुरु झाले असून, सुमारे ७ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेमध्ये राज्यातील दोन टप्प्यांमध्ये ११८ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचा निधी देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरु आहे. पहिल्या टप्प्‍यातील ६० बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२० अखेर सुमारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. ‘ई-नाम’ राबविताना शेतमालाचा दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळा देखील उभारण्यात आल्या असून, या प्रयोगशाळांमधून शेतमालाच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाइन लिलावासोबत खरेदीदाराला देण्यात येते. यामुळे शेतमालाला अधिकचा दर मिळणे शक्य होत आहे.’’ 

‘‘दुसऱ्या टप्प्प्यातील ५८ बाजार समित्यांचे कामकाज नुकतेच सुरु झाले असून, जुलै ते ऑगस्ट २०२० अखेर ७ कोटी २१ लाखांची उलाढाल झाली आहे. यासाठी या बाजार समित्यांचे सचिव, पदाधिकारी कर्मचारी व्यापारी आडते शेतकरी यांना दोनदा ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले. दृष्टीक्षेपात ‘ई-नाम’ आणि बाजार समित्या 

  •   पहिल्या टप्पातील ६० बाजार समित्यांद्वारे एकूण १ कोटी १६ लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री 
  •   ४ लाख ९९ हजार असेईंग (तपासणी) लॉट्सची निर्मिती 
  •   ११ लाख ८४ हजार शेतकरी संलग्न 
  •   १५ हजार अडत्यांकडून ‘ई-नाम’चा वापर 
  •   २४७ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग 
  •   प्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ६.१७
  • २० मार्च ते ३१ ऑगस्टदरम्यानची स्थिती 

  • ९ लाख ६९ हजार क्विंटल शेतमालाच्या विक्रीतून २७५ कोटींची उलाढाल 
  • ५७ हजार २१५ लॉट्सचे असेईंग (तपासणी) 
  • प्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ५.४६
  • दुसऱ्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज 

  • २२ हजार ८६० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री
  • ७ कोटी २१ लाखांची उलाढाल 
  • १९७ लॉट्सचे असेईंग
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    logo
    Agrowon
    www.agrowon.com