नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात, वरई, नागली ही प्रमुख जिरायती पिके आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करून आंबा लागवडी केल्या. चव, रंग व वासामुळे येथील आंब्याने बाजारपेठ मिळवल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले. मात्र चालू वर्षी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने कृषी विभागाच्या माहितीनुसार ७९६ हेक्टरवरील काढणी योग्य आंबा गळून पडला आहे. नुकसान ४० ते ५० टक्क्यांवर असल्याने ४७ कोटी रुपयांचा आंबा मातीमोल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात याहून अधिक नुकसान आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अनेक भागात हलका मध्यम पाऊस पडला. त्यातच पश्चिम भागातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातही नुकसान आहे. त्यामुळे हंगाम ऐन शेवटच्या टप्प्यात अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. पश्चिम पट्ट्यातील सुरगाणा व पेठ तालुक्यातील आंबा उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून घेतला आहे. काही वर्षांपासून कृषी विभाग, बायफ संस्था यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणावर आंबा लागवडी झाल्या. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून आदिवासी भागातील आंब्याने स्थानिक बाजारासह राज्याबाहेर ओळख निर्माण केली. येत्या आठ दिवसांत आंबा काढणीसाठी आलेला होता. मात्र बाजार समित्या बंद असल्याने काढणी ठप्प झाली होती; तर मागणीनुसार किरकोळ काढणी सुरू होती. १६ व १७ मे रोजी सलग दोन दिवसांच्या वादळामुळे काही भागात ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या तडाख्यात झाडावरून आंबा तुटून जमिनीवर पडल्याने मार लागल्याने फुटला आहे. आंब्याचा हंगाम अडचणीत जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रामुख्याने ७५ टक्के केसर आंबा लागवडी आहेत. यासह हापूस, राजापुरी, दशहरी, लंगडा व नीलम या प्रमुख जाती येथे आहेत. मात्र वादळामुळे आंबे काढणीपूर्वीच झडून पडले आहेत. त्यामुळे एकंदरीत आंबा हंगाम अडचणीत सापडला आहे.
प्रतिक्रिया इतर पारंपरिक पिके परवडत नसल्याने येथील आदिवासी शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत मुख्य पीक म्हणून आंबा लागवड केल्या आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. नुकसान प्रमाणापेक्षा अधिक असल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होईल. -यशवंत गावंडे, अध्यक्ष-वनराज शेतकरी उत्पादक कंपनी, गावंधपाडा, ता. पेठ
प्रतिक्रिया
कोरोनामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या व विक्री बंद असल्याने आंबा काढणी लांबणीवर ठेवली होती. त्यात वादळी वाऱ्यामुळे आंबा झडून पडला. काही झाडांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे उत्पादन हाती येऊन फायदा झाला नाही. बाजार समित्या बंद नसत्या तर नुकसान काही प्रमाणात टळले आहेत.
-केशव पालवी, अध्यक्ष-सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी
आंब्याचे उत्पादन, नुकसान असे...
(सरासरी ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे)
तालुकानिहाय नुकसान, बाधित क्षेत्र ( हेक्टरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.