संग्रामपूर, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शेत पाणंद रस्तेवाटपात संग्रामपूर तालुक्याला वंचित ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. याविरुद्ध तालुक्यातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालकमंत्री पाणंद रस्ते ही योजना भाजप सरकारच्या काळात अमलात आणली गेली होती. तेव्हापासून तालुक्यात पाच ते दहा रस्ते वर्षाला येत होते. मात्र या वेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतरस्ते मंजूर झाले असून, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याला एकही रस्ता मिळाला नाही. त्यामुळे तालुक्याला राजकीय द्वेषापोटी वंचित ठेवून जिल्हा प्रशासनाने हे काम केले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन पाठवीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमाल घरी आणायला तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे. या वेळी संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सचिन अग्रवाल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश अरबट, पंचायत समिती सभापती रत्नप्रभा धर्माळ, सुधीर लव्हाळे, किसान आघाडी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भालतिडक, महिला आघाडी अध्यक्ष हर्षा यादगिरे, गुणवंत खोडके, वासुदेव सवडतकर, गजानन मनसुटे, हर्षल खंडेलवाल आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.