
रत्नागिरी : मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्यानंतर बळिराजाला आर्द्रा नक्षत्रातील सरींवर अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील पेरण्यांची कामे जवळपास पूर्णत्वास आहेत. उर्वरित शेतीची कामे सुरू आहेत. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे बळिराजा चिंताग्रस्त आहे. कातळावरील भातशेतीला ही परिस्थिती त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा १ जुनपासून २३९ मिलिमीटर एवढा सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधी साडेनऊशे मिमी पाऊस झाला होता. साडेसहाशे मिमी कमी पावसाची नोंद यंदा झाली आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे खरीप हंगाम दहा दिवस लांबला आहे. अशीच स्थिती राहिल्यास बळिराजापुढील अडचणीत वाढ होणार आहे.
यावर्षी जूनचा पंधरवडा पावसाविनाच गेला. त्यापूर्वी मे महिन्यातही वळवाच्या पावसानेही पाठ फिरवली. यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. मृग नक्षत्रात पेरण्या पूर्ण करून शेतकरी निवांत असतात. परंतु, जूनच्या अंतिम आठवड्यातही कडक उन्हामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्याची कामे लगबगीने मार्गी लावली. परंतु, पेरलेले बी रूजण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस झाला नाही.
२२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. मृग नक्षत्रात काही प्रमाणातच पाऊस पडला. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली. पाऊस सक्रिय झाला या आशेने शेतकऱ्यांनी गडबडीने मशागतीची कामे आटोपली. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. मृगाच्या नक्षत्रात पावसाने फार उशिराने हजेरी लावली.
केवळ ढगाळ वातावरण आणि काही तासांच्या सरी वगळता पावसाने पाठच फिरवली आहे. ६ ते १९ जुलै या कालावधीत पुनर्वसू नक्षत्र असून या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. या दोन नक्षत्रावरच पावसाचे भवितव्य अवलंबून आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.