मराठवाड्यात वादळासह पावसाने पिके झाली आडवी

खरिपानंतर रब्बीची मका अवकाळी पाऊस व वादळामुळे संपली, व्हत्याचं नव्हतं झालं. एकामागून एक संकट येत असल्यानं काही सूचेनास झालयं. - ईश्‍वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
crop damage
crop damage

औरंगाबाद : मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाने शनिवारी (ता. २९) सायंकाळी व रविवारी (ता. १) पहाटे दणका दिला. त्यामुळे काढणीला आलेली आणि सोंगून ठेवलेली पिके भिजली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली. यामध्ये मका व गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. फळपिके व आंबा मोहरालाही या पावसाचा दणका बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.   औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २८) रात्रीनंतर सुरू झालेल्या वाऱ्यामुळे सोयगाव तालुक्‍यातील डोंगरालगतच्या भागातील काही पिके आडवी केली होती. त्यामध्ये शनिवारी सांयकाळनंतर आलेल्या जोरदार वादळासह पावसामुळे भर पडली. काढणीला आलेला गहू व तुऱ्यावरील मक्याचे पीक आडवे झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील जेहूर, शिऊर, लोहगाव, नागद, चापानेर, गल्लेबोरगाव, मनुर, ढोरकीन, घाटनांद्रा, बनोटी परिसरातील वरठाण, किन्ही, वडगाव, हनुमंतखेडा, पळाशी, मुखेड, वाडी, जायकवाडी, टाकळी राजेराय, गोळेगाव, दावरवाडी, विहामांडवा, नागापूर, रहिमाबाद, निल्लोड, वडोद बाजार व औरंगाबाद शहर परिसरात हलका पाऊस झाला. या पावसाबरोबरच बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट व जोरदार वादळी वारेही होते. जालना जिल्ह्यातील अंबड, जाफ्रबाद, भोकरदन तालुक्‍यात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. अंबड तालुक्‍यातील किनगाव परिसरात शनिवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले. किनगाव शिवारातील जगन्नाथ काळवणे यांच्या दीड एकरातील गहू वादळामुळे आडवा झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा,  उमरगा तालुक्‍याच्या काही भागांत शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणचे ज्वारीचे पीक आडवे झाले. काढणी केलेल्या हरभरा व गव्हाचे ढिगारे भिजले.  उस्मानाबाद शहर परिसरात रविवारी (ता. १) पहाटे दीडच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास हा पाऊस झाला. येडशी, तेर भागात पावसाचे प्रमाण होते. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या बेलकुंड, मातोळा मंडळात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिके भिजली. ज्वारीच्या कणसात पाणी गेल्याने ती काळी पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  प्रतिक्रिया तीन थैल्या मका लावली व्हती, तुरा येण्याआधीच सारी जमीनदोस्त झाली. आधी खरिपातली पिके गेली, आता ही हातची गेली.   - सुभाष मगर, वाकडी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com