चंद्रपूर ः शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये सानुग्रह अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयावर निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने धानाला १८३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. हा दर अत्यल्प असल्यामुळे त्यात वाढ करावी, अशी मागणी होत होती. काँग्रेसकडून देखील धानाला २५०० रुपये दर देण्याची मागणी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत होती. त्याची दखल घेत महाविकास आघाडीकडून धानाला सुरुवातीला ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला. त्यानंतर २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यामुळे धानाचे दर २५०० रुपयांवर पोचले. यातील ए ग्रेड धानाला १८३५ तर साधारण धानाला १८१५ रुपयांचा हमीभाव आहे.
शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने चुकारे केले जात असले तरी बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात टाकण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम असल्याने तत्काळ याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, अनिल धनवट, प्रभाकर दिवे, अरुण नवले, सतीश दाणी, मदन कांबळे, निळकंठ कोरांगे, सातपुते यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.