
सांगली : वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यांसह आणि गारांसह पाऊस झाल्यामुळे पॉलिहाउस, केळी, ऊस पिकांचे लाखोंच्या रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीतून सावरतोय तोपर्यंत कोरोना आणि आता वादळी वारा व पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी हातातोंडाशी आलेले पीक सोमवारच्या (ता.२६) पावसामुळे मातीमोल झाले आहे.
सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने शहर व परिसरात घरावरील पत्रे उडाले. मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाला. बहे रामलिंग परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या एक्स्प्रेस फ्रिडरवर झाडांच्या फांद्या पडल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. शहरातील बहुतांशी भागात सुमारे २० तास वीजवितरण व्यवस्था बंद पडली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर व सखल भागात पाणी साचून राहिले होते.
नेर्ले व परिसरात वादळी पावसाने पॉलीहाउस, केळी, ऊस यांचे ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले आहेत, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. येलूर, इटकरे, तांदूळवाडी परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. शेतीच्या पूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. पाण्याची ओढ बसलेल्या ऊस पिकास व पाणीसाठा वाढण्यासही मदत झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. फारसे नुकसान झाले नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.