
मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. २४) विधानसभेत जाहीर केले.
नियम २९३ नुसार झालेल्या दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री बोंडे बोलत होते. ते म्हणाले, की पीकविमा योजनेच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारी पाहता कंपन्यांवर संपूर्ण देखरेख करण्यात येणार आहे. या कंपन्यांचे जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक राहील. त्यांना जागा नसल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात थांबणे आवश्यक असेल. तसेच तालुका तसेच जिल्हास्तरीय तक्रार निवारण व्यवस्था काटेकोरपणे राबविण्यात येईत. सध्याच्या खरीप हंगामासाठी पीकविमा अर्ज भरण्याची प्रक्रिया पाहता तालुका स्तरावर सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर यासाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कृषी सहसंचालक हे याबाबतचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन नियंत्रण करणार आहेत.
पीकविमा योजनेमध्ये नुकसानभरपाईचे प्रमाण (पे-आउट) वाढावे यासाठी जोखीम स्तर ७० टक्क्यांवरून वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येईल. कर्जदार शेतकऱ्यांप्रमाणेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांनीही पीकविमा काढला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतील. गतवर्षी ९१ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आणि ८७.४ टक्के परतावा देण्यात आला. विमा कंपनीने विलंबाने नुकसानभरपाई दिल्यास विलंबाच्या कालावधीसाठी १२ टक्के व्याज वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. बोंडे यांनी सांगितले.
अमरावती विभागात १३ हजार हेक्टरवरील आणि नागपूरमधील ५ हजार हेक्टरवरील वाळलेल्या संत्रा बागांसाठी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊन त्यांच्या फळबागा पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. बोंडे या वेळी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
या प्रस्तावावरील चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, अजित पवार, सुभाष साबणे, राजेश टोपे, राजेंद्र पाटनी, राजाभाऊ वाजे, वीरेंद्र जगताप, शंभूराज देसाई, गणपतराव देशमुख, बाळासाहेब पाटील, राहुल कुल, श्रीमती मनीषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.