ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन; वन्यजीव, जैवविविधता धोक्यात

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा धोका आहे. तरीही वन, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरी येथे उत्खननाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन; वन्यजीव, जैवविविधता धोक्यात Illegal excavations on Brahmagiri mountain; Wildlife, biodiversity under threat
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन; वन्यजीव, जैवविविधता धोक्यात Illegal excavations on Brahmagiri mountain; Wildlife, biodiversity under threat

नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा धोका आहे. तरीही वन, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरी येथे उत्खननाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या नाशिक जवळच्या संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत. त्यामुळे वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधतेचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रम्हगिरी कृती समितीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या संबंधी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     ब्रह्मगिरी आणि सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.१८) भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ब्रम्हगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.           निवेदनात म्हटले आहे, ‘‘युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर आहे. येथे सुपलीचा मेट या आदिवासी बांधवांच्या पाड्याखाली जिलेटिन कांड्यांचा वापर करून सुरुंग लावून ब्रह्मगिरीच्या पोटात ''ब्रम्हा ग्रीन'' या प्रकल्पांतर्गत खासगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.  सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करून योग्य तो कायदा करून सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्के वाढवावे. त्यासाठी कायद्याचा उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी. ब्रह्मगिरी, सह्याद्री उत्खननात वापरल्या गेलेल्या जिलेटिन कांड्यांची चौकशी करण्यात  यावी.’’  पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल पालकमंत्री भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ब्रह्मगिरी बचाव समितीच्या सदस्यांना त्यांनी सांगितले. त्यामुळे विविध पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रह्मगिरी कृती समितीने  समाधान व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com