अमरावती ः जिल्ह्यात या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, आठ तालुक्यांतील भूजलात एक मीटरपर्यंत वाढ, तर पाच तालुक्यातील पातळीत काही अंशी घट नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून जानेवारी अखेर करण्यात आलेल्या १५० विहिरींच्या निरीक्षणाअंती ही नोंद घेण्यात आली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला दोन महिने पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, ऑगस्ट महिन्यानंतर पावसाने रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत कायम होती. याशिवाय परतीच्या पावसाचाही जिल्ह्याला तडाखा बसला. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले. यामध्ये अचलपूर, अमरावती, अंजनगावसुर्जी, भातकुली, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, दर्यापूर, धामणगाव रेल्वे या तालुक्यांमध्ये भूजलात एक मीटरपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. ही बाब सुखावणारी असली तरी पाच तालुक्यांतील पातळीत त्याच वेळी घटही नोंदविली गेली आहे. त्यामध्ये चिखलदरा, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख हेक्टर संत्रा लागवड आहे. वरुड, मोर्शी हे दोन तालुके संत्रा लागवड क्षेत्रामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. संत्रापट्ट्यात पाण्याचा अधिक उपसा होत असल्याने हे दोन तालुके ड्रायझोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांत बोअरवेलवर बंदीदेखील लादली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाचे दिवसामान वाढीस लागल्याने भूजल पातळीत सुधारणा होत असल्याचे सुखद चित्र आहे.
अचलपूर तालुक्यात सर्वाधिक पातळी तालुक्यात या वर्षी जानेवारी अखेर ०.९५ मीटर पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्प जरी तालुक्यात असला तरी अमर्याद उपसा व भूजल पुनर्भरण न झाल्यामुळे तालुक्यातील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्याचवेळी अचलपूर तालुक्यात यंदा भूजल पातळीत सर्वांत जास्त १.२३ मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.