
अकोला : मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला शासनाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे उत्पन्न कमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कळते. मागासवर्गीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंचन व इतर शेती घटकांद्वारे मदत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली होती. विहीर खोदणे, बांधकाम, वीज जोडणी, विद्युत पंप, ठिबक, तुषार संच आदी साठी योजनेतून तीन लाखांपर्यंत मदत केली जाते. सोबतच शेततळे, विहिरीतील बोअर घेण्यासाठीही मदत केली जाते. या योजनेसाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जातात. त्यानंतर सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येत होती. कृषी आयुक्तालयाने नुकतेच या बाबत एक पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकाऱ्यांना पाठवले आहे. २०२०-२१मध्ये योजनेच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.