औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे कार्यालयातर्फे करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या औरंगाबाद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आणि ढोलताशा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले.
निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बाहेरील असंपादित क्षेत्रात पाणी आले. त्यामुळे नुकसान होणाऱ्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. या आधी अनेकदा आंदोलन, निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता.२६) पुन्हा एकदा मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त वांजोळा व विडोळी येथील शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली होती.
निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के खाली करून बाधित शेतकऱ्यांची शेतजमीन भूसंपादित करा. त्याची मोजणी करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांच्या स्वाक्षरीनिशी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होईल, या आशेने आंदोलन स्थगित केल्याचे आंदोलनकर्ते शेतकरी स्वप्नील चव्हाळ यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.