दूध, अन्नपदार्थ, औषधांमध्ये भेसळ केल्यास आजन्म कारावास

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

मुंबई  :  दूध किंवा इतर खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अगोदर अवघी सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद असलेला अदखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा आता दखलपात्र करण्यात आला असून, कठोर शिक्षेची तरतूद करणारे सुधारणा विधेयक गुरुवारी (ता.२२) विधानसभेत आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आले.

१८६० च्या भारतीय दंड संहितेच्या अधिनियम ४५ मधील कलम २७२ ते २७६ अन्वये खाद्यपदार्थ, पेय, औषधे आणि औषधासाठी लागणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ केल्यास  सहा महिने कारावास आणि एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद होती. याशिवाय अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३६ अन्वये याच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद आहे.

औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० च्या नियम २३ आणि नियम २७ मध्ये मात्र याच गुन्ह्यासाठी दहा वर्षे ते आजन्म कारावासासारख्या कडक शिक्षेची तरतूद आहे. ही बाब लक्षात घेता अन्न आणि औषधे भेसळीसंबंधीच्या अपराधांसाठी वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळ्या स्वरूपाची शिक्षा असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या सर्व प्रकारच्या कायद्यात अन्न आणि औषधांमध्ये भेसळीच्या गुन्ह्यासाठी एकाच स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार आता या गुन्ह्यासाठी आजन्म कारावास आणि दंडाची तरतूद असलेली सुधारणा करण्यात आली आहे. परंतु, न्यायालयास काही अपवादात्मक परिस्थितीत पुरेशी कारणे नमूद करून आजन्म कारावासाची शिक्षा कमी करून त्यापेक्षाही कमी कालावधीची शिक्षा देण्याचीही तरतूद यात करण्यात आली आहे. हे विधेयक आता मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडले जाणार आहे.

दरम्यान, अन्न पदार्थातल्या आणि दूध भेसळीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार संबंधित कायद्यात बदल करून कायदा अधिक कठोर करणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत दिली. राज्यात दूधभेसळीचे प्रकार सर्रास सुरू असून, काही समाजकंटक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत काँग्रेसचे भाई जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. बापट यांनी या कायद्यात सुधारणा करण्यासाठीचे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सुधारित कायद्याप्रमाणे भेसळ करण्याचा गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र होणार असून, आजन्म कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात असणार आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत नाकाबंदी करून दुधाचे टँकर तपासण्यात आले होते, त्यात आढळलेले १९ हजार लिटर असुरक्षित दूध नष्ट करण्यात आले, काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती बापट यांनी या वेळी दिली.

नमुन्यांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि कर्मचारी अपुरे असल्यामुळे या कारवाईला विलंब होतो, असे त्यांनी सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान भाई जगताप यांनी भेसळ रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, बापट यांनी ही मागणी फेटाळून लावत यासाठी महानगरपालिका स्तरावर असलेल्या समित्या योग्य काम करीत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com