नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची निवड फायदेशीर ठरते. त्या पार्श्वभूमीवर जवस नजीकच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्यासोबतच आरोग्य संवर्धनालाही पोषक ठरले आहे. त्यामुळे जवस लागवडीवर शेतकऱ्यांनी भर देण्याचे आवाहन सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले. कृषी महाविद्यालय नागपूरअंतर्गंत असलेल्या अखिल भारतीय समन्वित जवस संशोधन प्रकल्पाच्या वतीने सातारा जिल्ह्यात जवस पिकाचे प्रथम प्रात्यक्षिक राबविण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नागपूर येथील प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. बीना नायर, डॉ. जीवन कतोरे, सातारा तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, आत्माचे सुनील साबळे, केव्हीकेचे भूषण यादगीरवार, डॉ. महेश बाबर यांची या वेळी उपस्थिती होती. अकोला कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पीकेव्ही एनएल-२६० या जवस वाणाची सातारा परिसरात लागवड करण्यात आली आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ओमेगा-३ या घटकाचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत सर्वाधिक असते. त्यामुळे जवस वाणाला मागणी असल्याने याखालील क्षेत्रही वाढते आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. नायर यांनी या वेळी बोलताना दिली. चिंचनेर वंदन व चिंचनेर निंब (जि.सातारा) या भागात जवस पीक लागवड अधिक आहे. इतर भागातील शेतकऱ्यांनी याची पाहणी करून आपल्या भागातही लागवड वाढीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. जवसापासून विविध मूल्यवर्धित पदार्थसुद्धा महिला समूहांमार्फत तयार करून त्याची विक्री शक्य आहे. आरोग्याप्रती जागरूक ग्राहकांकडून त्याला मागणी असल्याने जवस पीक फायदेशीर ठरते, असेही या वेळी सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.