राजुरातील हिरव्या मिरचीची बाजारपेठ गडगडली 

बांगलादेशला होणारी निर्यात थांबल्याच्या परिणामी राजुरा बाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारात दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. परिणामी मिरची उत्पादक हतबल झाले आहेत.
The market for green chillies in Rajura collapsed
The market for green chillies in Rajura collapsed

अमरावती ः बांगलादेशला होणारी निर्यात थांबल्याच्या परिणामी राजुरा बाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारात दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. परिणामी मिरची उत्पादक हतबल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने मिरचीची तोड थांबविल्याने त्याचा परिणाम प्रतवारीवर होण्याची भीती वर्तविली जात आहे.   राजुरा बाजार येथील बाजारात हिरव्या मिरचीची मोठी उलाढाल होते. मोर्शी, नरखेड, काटोल, आष्टी (शहीद), आर्वी, पांढूर्णा (मध्य प्रदेश) या भागातील शेतकरी हिरवी मिरची विक्रीसाठी या बाजारात आणतात. देशाअंतर्गंत तसेच बांगलादेशला देखील या भागातील मिरचीची निर्यात होते. त्यामुळे मिरची उत्पादकांना चांगला दर मिळतो. एकरी एक तोडा ३० ते ४५ क्‍विंटलपर्यंत उत्पादन देणारे संकरीत वाण आल्यामुळे उत्पादनही वाढले. मात्र नजीकच्या काळात बांगलादेशमधील निर्यात थांबल्याच्या कारणाआड व्यापाऱ्यांकडून मिरचीची कमी दरात खरेदी होत असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. एक किलो मिरची तोडून बाजारापर्यंत आणण्यावर शेतकऱ्यांचा प्रती किलो सुमारे दहा रुपयांचा खर्च होतो. तथापि, गेल्या पंधरवाड्यापासून मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रती क्‍विंटलचाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी सहा हजार पाचशे रुपये क्विंटलने मिरचीचे व्यवहार झाले होते. बांगलादेश मधून मागणी वाढल्यास दरात तेजी येते असा अनुभव आहे. त्या भागातील व्यापारी थेट राजुरा येथे येत मिरचीची खरेदी करतात. सध्या बांगलादेशमध्ये मिरचीचा हंगाम सुरू असल्याने त्याच भागात उत्पादित मिरचीची आवक येथील बाजारात होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे राजुरा येथील मिरचीचा उठाव त्यांच्याकडून अद्याप झाला नाही.  मिरची तोडणीस येऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र भाववाढीच्या अपेक्षेने बाजारातील आवक मंदावली आहे. भाववाढीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी झाडावरच मिरची प्रत यामुळे खालावत आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात मिरचीची उलंगवाडी होते. 

प्रतिक्रिया  बांगलादेशला होणारी निर्यात थांबली. जबलपूर, रायपूर येथे मिरची पाठविण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. अमरावती, नरखेड रेल्वेने दिल्ली बाजारपेठेत माल लवकर पोचतो. तरी सुद्धा पुढील पंधरवाड्यात दरात सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबर ते मार्च, असा मिरचीचा हंगाम आहे. दरातील तेजीच्या अपेक्षेने सध्या जेमतेम दोन गाड्या इतकी अत्यल्प मिरचीची आवक होत आहे.  - अनिल उर्फ मुन्ना चांडक, व्यापारी.  --  दिवाळीत भाववाढीच्या अपेक्षेने तोडा थांबविला होता. आताच्या दरापेक्षा मिरची वाळवली तर फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.  - योगेश भोंडे, मिरची उत्पादक, राजुरा बाजार  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com