
नगर : ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर आहे. सरकारची कोणतीच यंत्रणा मदतीला नसल्याने, जनतेवर आता ‘माझा जीव, माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे,’’ अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोविड संकटात संगमनेर तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विखे म्हणाले, ‘‘सरकारची व्यवस्था अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात. हीच खरी ईश्वर सेवा आहे. कोविड संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाहीत. इंजेक्शने जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे, तर काही खासगी रुग्णालयांत कंपाउंडरच सल्ले देऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना घाबरवून सोडत आहेत.
या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती; पण मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देतात. सरकारी यंत्रणेचे सोडा; मंत्र्यांनी स्वतःहून नागरिकांसाठी काय केले? सरकारची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत.’’ गावागावांतून उभी राहिलेली कोविड सेंटरच आता सामान्य माणसाला आधार ठरतील, असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.