तेल कंपन्याही उभारणार बारा इथेनॉल प्रकल्प
तेल कंपन्याही उभारणार बारा इथेनॉल प्रकल्प

तेल कंपन्याही उभारणार बारा इथेनॉल प्रकल्प

इंधनामध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २०२५ पर्यंत साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार पावले उचलली आहेत. साखर कारखानदारांबरोबरच आता तेल कंपन्यांनीही इथेनॉल प्रकल्प उभारावेत, अशा सूचना केंद्र सरकारने तेल कंपन्यांना केल्या आहेत.

कोल्हापूर : इंधनामध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २०२५ पर्यंत साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार पावले उचलली आहेत. साखर कारखानदारांबरोबरच आता तेल कंपन्यांनीही इथेनॉल प्रकल्प उभारावेत, अशा सूचना केंद्र सरकारने तेल कंपन्यांना केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनुसार देशभरात इथेनॉल तयार करणारे १२ प्रकल्प तेल कंपन्यांमार्फत उभे राहतील, यासाठी सुमारे पाच ते सात हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा सर्व खर्च कंपन्यांनी स्वतःच्या फंडातून करायचा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तेल कंपन्यांना इथेनॉल प्रकल्प उभारण्याच्या सूचना केंद्राकडून करण्यात आल्या आहेत.  या कंपन्या इथेनॉल प्रकल्प उभारण्याबरोबरच बाहेरून येणाऱ्या इथेनॉलसाठी साठवण क्षमतेच्या सुविधाही तातडीने तयार करतील.  कंपन्यांना वार्षिक १५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास सांगण्यात आले आहे.  अनेक राज्यांतून तेल कंपन्यांकडे इथेनॉलचा पुरवठा होण्यासाठी अडथळे येत आहेत. वाहतूक नियमांमध्ये सुधारणा न केल्याने काही राज्यातून अद्याप इथेनॉलची वाहतूक कंपन्यांकडे होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे इथेनॉलचे मिश्रण करणे अडचणीचे बनत आहे. या सर्व समस्येतून मार्ग काढण्याकरिता आता तेल कंपनीनेच इथेनॉलची निर्मिती करावी, असा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करावे यासाठी कारखान्यांना सोयी-सवलती देणे नवीन प्रकल्पांना जास्तीत जास्त सुलभतेने कर्ज देणे, जादा कालावधीसाठी कर्जपुरवठा करणे असे धोरण आखले आहे. या सुविधेमुळे यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीपेक्षा जादा प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होईल, अशी शक्यता आहे.  २०२१ मध्ये भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य पाच टक्क्यांपर्यंत साध्य केले आहे. येत्या वर्षभरामध्ये ते आठ टक्के इतके होईल. गेल्या वर्षी १७३ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी झाली होती. यंदा ३३० ते ३४० कोटी लिटरपर्यंत इथेनॉलची खरेदी तेल कंपन्यांनी करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. २०२५ चे लक्ष पूर्ण करण्यासाठी साधारणत: एक हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज लागेल, यामुळे साखर कारखाने, इतर खासगी इथेनॉल प्रकल्पासह तेल कंपन्यांनीही इथेनॉल तयार करावे, यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीलाही प्राधान्य पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, की केवळ ऊस रस व साखरेपासून इथेनॉलनिर्मिती न करता तांदूळ, मका आणि इतर धान्यांपासूनही इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. या धान्यांपासून ज्या प्रकल्पांना इथेनॉल करायचे आहे, त्यांना बँकांनी निधी द्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने बँकांना करण्यात आले आहे. जिथे बँकांमार्फत कर्जपुरवठ्याला अडचणी येतील, तिथे स्वतः केंद्रशासन पुढाकार घेऊन अशा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातून ही इथेनॉल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पसंती वाढत असल्याचे पेट्रोल मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com