चाफे, धामणसेत एक एकर भातशेती वाहून गेली 

रत्नागिरी तालुक्यात चाफे, धामणसे येथे नदीच्या पुरात किनाऱ्यावरील सुमारे एक एकराहून अधिक भातशेती वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
चाफे, धामणसेत एक एकर भातशेती वाहून गेली  One acre of paddy was carried to Chafe, Dhamanset
चाफे, धामणसेत एक एकर भातशेती वाहून गेली  One acre of paddy was carried to Chafe, Dhamanset

रत्नागिरी : मुसळधार पावसाचा जोर जिल्ह्यात कायम असून, राजापुरातील अर्जुना नदीला पूर आला आहे. रत्नागिरी तालुक्यात चाफे, धामणसे येथे नदीच्या पुरात किनाऱ्यावरील सुमारे एक एकराहून अधिक भातशेती वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नदीचा गाळ साचल्यामुळे दुबार पेरणी करणेही अशक्य आहे.  सोमवारी (ता.१९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १३०.९९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. राजापूर तालुक्यात नाटे येथील ठाकरेवाडी जवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे शिळ-दोनिवडेसह विविध मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गावागावातील छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धामणसे येथील नदीच्या पुराच्या पाण्यात सरिता गणपत डाफळे यांची १० गुंठे भातशेती वाहून गेली आहे. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी लावणी केली होती. पुराच्या पाण्याबरोबर नदीतील गाळ शेतीत साचला आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर जमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणीची शक्यता कमी आहे. तसेच चाफे येथेही नदीच्या पुरामुळे किनाऱ्यावरील सुमारे एक एकरहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे १२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.  रत्नागिरीत पावसमधील गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आजूबाजूच्या सखल भागात पाणी शिरले होते. संगमेश्‍वर फुणगूस येथील शास्त्री खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खाडीपट्यात पूरजन्य परिस्थिती होती. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीत पाणी शिरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. शेतीची कामे अर्धवट सोडून ते घरी परतले.  रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे सोमेश्‍वर, पोमेंडी येथील किनारी भागातील भातशेती पाण्यात गेली होती. दापोली दाभोळ येतील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे शैलेश दत्ताराम चव्हाण (वय ३३) व चेतन सुरेश सागवेकर (वय १८) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. राजापूर तालुक्यातील महाळुंगे मधलीवाडी येथे सुमारे पाचशे मीटरच्या परिसरात जमीन खचली असून, रस्त्यालाही भेगा गेल्या आहेत. तेथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. मधलीवाडी परिसरातील अन्य चार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com