
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या १ लाख ३१ हजार ६६५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदाच्या हंगामासाठी ९ लाख ४७ हजार ७१७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.
यंदा लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनी वाफशावर न आल्याने रब्बी हंगाम लांबणीवर पडला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही अंशी रब्बीच्या पेरणीला गती मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख ४८ हजार ४८१ हेक्टर आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ८१० हेक्टर, जालना २ लाख १७ हजार ८०० हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे.
यंदा तीनही जिल्ह्यांत ९ लाख ४७ हजार ७१७ हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ११४ हेक्टर, बीड ४ लाख ४ हजार ५२३ हेक्टर, तर जालना जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ८० हेक्टर प्रस्तावित क्षेत्राचा समावेश आहे.
तीनही जिल्ह्यांत प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई या पिकांसह इतर पिकांची पेरणी केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी प्रस्तावित बियाणे बदल दरानुसार तिन्ही जिल्ह्यांसाठी सार्वजनिक क्षेत्राकडून ६९ हजार २९४ क्विंटल, खासगी क्षेत्राकडून ६१ हजार २६१ क्विंटल मिळून १ लाख ३१ हजार ६६५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासेल.
‘महाबीज’कडे ५८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
महाबीजकडे ५८ हजार २५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक क्षेत्राकडून ७९४७ क्विंटल, खासगीतून १५६८ क्विंटल मिळून ९११५ क्विंटल बियाणे पुरवठा झाला होता. तर २८८७ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.