वर्धा जिल्ह्यात १ हजार २० हेक्टरवर होणार फळबाग लागवड : देशभ्रतार

वर्धा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. या वर्षी जिल्ह्यात १ हजार २० हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे.
 Orchards will be planted on 1,020 hectares in Wardha district: Deshbhratar
Orchards will be planted on 1,020 hectares in Wardha district: Deshbhratar

वर्धा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. या वर्षी जिल्ह्यात १ हजार २० हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे. १ हजार २३३ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लागवडीसाठी लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात योजने अंतर्गत जास्तीत जास्त फळबाग लागवडीचा कार्यक्रम घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी फळबाग लागवड योजना, सिंचन आराखडा, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, अपघात विमा योजना, पीक कापणी प्रयोग, कृषी पायाभूत निधी, पोकरा योजना, ग्राम बीजोत्पादनाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, उमेदच्या स्वाती वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

‘‘फळबाग ही किफायतशीर आणि कमी खर्चाची शेती आहे. या शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी फळबाग लागवड हा कार्यक्रम रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत’’, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या वर्षी जिल्ह्यात १ हजार २० हेक्टरवर फळबाग लागवड केली जाणार आहे. तर जिल्ह्यातील १ हजार २३३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यापैकी आतापर्यंत ६५० शेतकऱ्यांनी सुमारे ६०० हेक्टरवर फळबागेची लागवड केली आहे. जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, कारंजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी १२० हेक्टर, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात प्रत्येकी १८० हेक्टर, तर आष्टी तालुक्यात ६० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे.

‘शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे’

जिल्ह्यात मोठया प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीनच्या पेरणीसाठी प्रतिहेक्टर १०० किलो इतके बियाणे लागतात. बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांना त्याची खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचेच बियाणे पुढील वर्षासाठी राखीव ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत १ लाख ३० हजार इतके बियाणे राखीव ठेवण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com