
नाशिक : जिल्ह्यात भात उत्पादन घेणाऱ्या अनेक भागांत भात लागवडीपूर्व तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी भात रोपांच्या निर्मितीसाठी जमीन तयार करून साळ फुलून दिली आहे. मात्र, जून अखेरीसही पावसाचे आगमन न झाल्याने दुबार साळ फुकणी करावी लागते की काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. या अडचणीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या हंगामातील भात लावणीच्या कामात अडचणीत वाढ होणार आहे. इगतपुरीची पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्यभर पाऊस पडत असला तरी या तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम भाताच्या रोपांवरही झाला आहे. यंदा भाताची रोपेही अद्याप तयार झाली नसल्याने सहा तालुक्यांतील शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास पेरणी सुरू केली जाते, तर मॉन्सून पूर्व पावसाच्या भरवशावर भातासाठी साळ फुकून रोपे तयार केली जातात. भात लागवडीबाबत जूनच्या तिस-या आठवड्यापर्यंत भात पिकविणा-या तालुक्यांमध्ये पाऊस पुरेसा न झाल्याने भाताची रोपे करण्यासाठी नर्सरी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. जूनमध्ये नर्सरीत रोपे तयार होण्यास टाकल्यास साधारणत: दीड महिन्यात रोप लागवडी तयार होते व त्यानंतर जुलैअखेर व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भाताची लावणी सुरू केली जाते. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण व सटाणा तालुक्यांतील काही भागांत भाताचे पीक घेतले जाते. आता नर्सरीच तयार झाली नसल्याने भाताची लावणीदेखील लांबणीवर पडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.