यवतमाळ : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. त्यामुळे आजघडीला तीन मोठ्या, सात मध्यम आणि ८५ लघू प्रकल्पांत मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. जिल्ह्यात दर वर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ कृत्रिम असतो, तर कधी नैसर्गिक. यंदा चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले व प्रकल्पात बराच जलसाठा शिल्लक आहे. दर वर्षी शेतकऱ्यांपासून ते मुक्या प्राण्यांनाही टंचाईची झळ सोसावी लागली. गेल्या वर्षी काही भागात तीव्र पाणीटंचाई होती, तर काही भागातील नागरिकांना थोड्या प्रमाणात टंचाईचे चटके सोसावे लागले. जीवन प्राधिकरणाचे नळ पाच ते सहा दिवसानंतर येत होते. अनेकांना तर पाण्यासाठी रात्रं-दिवस दूरवरून पाणी आणावे लागत होते. लघू जलाशय कोरडे झाले होते. मात्र या वर्षी उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिलमध्ये नागरिकांना पाण्याची चणचण भासणार नसल्याची स्थिती आहे. मे महिन्यात कडक उन्हाळा पडल्यास पाण्याची चणचण भासण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. जिल्ह्यात पूस, अरुणावती आणि बेंबळा हे तीन मोठे प्रकल्प आहेत. सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, लोअरपूस, अडाण आणि नवरगाव असे सात मध्यम प्रकल्प आहेत. तर पाटबंधारे विभागाचे ७४ आणि महामंडळाचे ११ असे एकूण ८५ लघू प्रकल्प आहेत. सध्या प्रकल्पात असलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता कमी आहे.
आराखडा साडेसात कोटी रुपयांचा दुर्गम भागातील गाव, वस्ती, पोड अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहता यंदाचा आराखडा कमी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची समस्या कमी जाणवणार अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.