
सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. या पावसाने २१ हजार ३५२ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापैकी सर्वाधिक नुकसान द्राक्षाचे झाले. कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला आहे. मात्र, नुकसान भरपाई कधी, असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी भरपाईची प्रतीक्षा करू लागला आहे.
जिल्ह्यात १ ते ४ डिसेंबर या चार दिवसांत मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. यामधील एका दिवशी सुमारे १६ तास पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील २० हजार ५०४ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. त्याबरोबर डाळिंबाचे ८५ हेक्टर तर हरभऱ्याचे ३७७ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासह भाजीपाला पिकांना देखील या पावसाचा फटका बसला. आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, वाळवा, कडेगाव, पलूस, जत तालुक्यातील सुमारे ३८४ गावातील पिके बाधित झाली.
जिल्ह्यातील बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी पाहणी केली. त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंधरा ते वीस दिवसांत पंचनामे पूर्ण केले. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. शासनाने अहवाल सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहेत. भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.