
सातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली आहेत. या योजनेत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला असून, सुमारे पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी मिळणार आहे.
ग्रामीण भागामध्ये पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी होण्याच्या उद्देशाने गावात प्रत्येक घरात नळजोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. सन २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहरी भागांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.
जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून, आतापर्यंत सुमारे चार लाख ५९ हजार ५५१ कुटुंबांना नळ कनेक्शन दिली आहेत. जिल्ह्यात एक हजार ७६३ गावांतील घरांना नळ कनेक्शन दिली आहेत. जलजीवन मिशनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे. सातारा जिल्ह्याने नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा जलजीवन मिशनमध्ये आघाडीवर राहिला आहे. १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निधीही वितरित केला आहे. या मिशनमुळे दुर्गम व डोंगरी भागात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे.
जिल्ह्याला सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची तालुकानिहाय बैठका घेऊन योजनानिहाय सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. - सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.