ढगाळ वातावरणाने तूर उत्पादक धास्तावले

चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या तुरीचे पावसाने नुकसान होते की काय या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.
ढगाळ वातावरणाने तूर उत्पादक धास्तावले
ढगाळ वातावरणाने तूर उत्पादक धास्तावले

नगर : मुबलक पाऊस आणि चांगल्या स्थितीमुळे यंदा तुरीचे पीक जोमात आहे. राज्यात यंदा बारा लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले आहे. आता बहुतांश भागात काढणीला सुरवात झाली आहे. मात्र चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या तुरीचे पावसाने नुकसान होते की काय या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.    राज्यात यंदा साधारण १२ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली आहे. सर्वाधिक यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, लातूर, नांदेड, सोलापुर, नगर, उस्मानाबाद भागात तुरीचे क्षेत्र अधिक आहे. मराठवाडा, विदर्भात प्रत्येकी साधारण ४० टक्के व उर्वरित महाराष्ट्रात २० टक्के तुरीचे क्षेत्र असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य अभ्यासकांच्या मते यंदा पेरणीपासूनच सतत पाऊस असल्याने जास्ती पाऊस झालेल्या भागात तुरीचे नुकसान झाले. सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेंगा खाणारी आळी पडली. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात वाळवीचाही तुरीवर परिणाम होऊन फूलगळ झाली. मात्र चांगल्या पावसामुळे साधारण ७५ ते ८० टक्के क्षेत्राला पोषण वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम यंदा उत्पादन वाढीत दिसणार आहे. गेल्यावर्षी राज्यात सरासरी हेक्टरी ८.७९ क्विंटल उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी राज्यात १० लाख ५९ हजार टन तुरीचे उत्पादन झाले होते. यंदा ते ९ ते १० क्विंटलपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने बारा लाख टनाच्या पुढे उत्पादन जाण्याचा अंदाज आहे. सध्या बहुतांश भागात तुरीची काढणी सुरु आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून नगरसह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. यंदा तुरीचे पीक जोमात असताना ऐन काढणीच्या काळात पाऊस आला तर तुरीचे नुकसान होणार नाही ना याची तूर उत्पादकांना चिंता लागली आहे.   प्रतिक्रिया... राज्यात यंदा काही भागात झालेल्या जास्तीच्या पावसाने झालेले परिणाम वगळता बहुतांश भागात तुरीची स्थिती चांगली आहे. आता पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. काढणी केलेली तूर भिजणार नाही याबाबत उपाय करावेत. - डॉ. एन.एस. कुटे, विभाग प्रमुख, कडधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

यंदा तुरीचे पीक चांगले आहे. मात्र आता पावसाने नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जोमदार पीक असल्याने उत्पादनात यंदा वाढ होणार आहे. - रामदास अडसुरे, शेतकरी,  निमगाव घाणा, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com