पुणे : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केलेली आहे, त्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित एफआरपी द्यावी लागेल, असे स्पष्ट करत एफआरपी मोडणाऱ्या साखर कारखान्यांवर त्वरित कारवाई करू, असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दिले. चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बेकायदा एफआरपीचे तुकडे केलेले आहेत. तसेच इथेनॉलनिर्मितीमुळे अनेक साखर कारखान्यांची साखर उतारा कमी झाला आहे. याचा परिणाम उसाच्या ‘एफआरपी’वर झाला आहे. या संदर्भात राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पुणे येथील कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. या वेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. त्यांच्यावर त्वरित आरआरसीची कारवाई करण्यात यावी. त्या शेतकऱ्यांना व्याजासहित पैसे वसूल करून द्यावेत. तसेच राज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट बी हेवी मोलॅसिस, इथेनॉलची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा उतारा कमी झाला आहे. संबंधित साखर कारखान्यांची यादी प्रकाशीत करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना वाढीव एफआरपी मिळू शकेल.’’ साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची तुकडे केले आहेत, त्या कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावीच लागेल. संबंधित सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात. त्यांचे पैसे व्याजासहित वसूल करून देऊ. तसेच उसाच्या रसापासून बी हेवी मोलसिस व इथेनॉलनिर्मिती केलेल्या साखर कारखान्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच ती यादी तुम्हाला सुपूर्द केली जाईल.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.