ताग मिल बंद का पडत आहेत?

रब्बीशेतमालाच्या साठवणुकीसाठीतागाच्या गोण्यांची गरज असताना ताग मिल बंद का पडत आहेत, वाचा सविस्तर.
Why are jute mills shutting down
Why are jute mills shutting down

पुणे (वृत्तसंस्था) : तागाच्या कापडाला जास्तीत जास्त ₹६५०० प्रतिक्विंटलचा भाव ठरवण्याचा निर्णय ताग आयुक्तांनी घेतला आहे. याचा विपरीत परिणाम देशभरातील ताग मिलवर पडत असून त्यातील कित्येक मिल बंद पडल्या आहेत. याउलट शेतमालाची साठवणूक करताना तागाची गोणी वापरण्याऐवजी प्लास्टिकच्या कट्ट्यांचा उपयोग होतोय. गोण्यांची यंदाच्या रब्बी हंगामातील जवळपास ५० टक्के मागणी पॉलिप्रोपिलिनच्या (polypropylene bags) कट्ट्यांकडे वळली आहे.

ताग उद्योगातील सुत्रांच्या माहितीनुसार एकट्या पश्चिम बंगालमध्ये १५ ताग मिल बंद पडल्या आहेत. देशातील एकूण ताग लागवडीच्या ८० टक्के क्षेत्र एकट्या पश्चिम बंगालमध्ये असते. यातून देशातील एकूण ताग उत्पादनाच्या ८३ टक्के उत्पादन निघते. बिहार, आसाम, आणि आंध्र प्रदेशच्या ताग उत्पादक पट्ट्यांतही परिस्थिती जवळपास अशीच आहे. तागाच्या गोण्यांसाठी लागणारा कच्चा माल महाग झाला असून मिलच बंद पडत असल्याने तागाच्या गोण्यांचा पुरवठा खोळंबला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने ७ मार्चला जारी केलेल्या अधिसुचनेनुसार २०२२-२३ रब्बी बाजार हंगामात २३ लाख ताग गाठींची गरज असताना इंडियन ज्युट मिल्स असोसिएशनकडून (IJMA) फक्त १० लाख ताग गाठी पुरवल्या जाणार आहे. जानेवारी ते मेपर्यंतच्या काळात हा पुरवठा करण्यात येणार आहे. “त्यामुळे राज्य सरकारे आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) अन्नधान्याच्या साठवणुकीची पर्यायी व्यवस्था करून विभागाला कळवावे,” असे या अधिसुचनेत म्हटले आहे.

उरलेल्या १३ लाख ताग गाठींच्या मागणीची पूर्तता पॉलिप्रोपिलिनचे कट्टे वापरून भागवली जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी बिझनेस लाईनशी बोलताना सांगितले. गेल्या हंगामात ताग उद्योगाकडून १२ लाख ताग गाठींची पूर्तता करण्यात आली होती. तर उरलेल्या १२ लाख गाठींची मागणी पॉलिप्रोपिलिनच्या कट्ट्यांनी भागवली गेली होती. “बाजारभाव ₹७२०० च्या घरात असताना जास्तीत जास्त ₹६५०० क्विंटलने माल पुरवठ्याची मर्यादा घातल्याने मिल उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले आहे,” अशी प्रतिक्रिया सुत्रांनी बिझनेस लाईनशी बोलताना दिली.

कलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतेच ताग आयुक्तांना गोणी निर्मिती उद्योगाला कच्च्या तागाचा पुरवठा ₹६५०० क्विंटलने होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यापेक्षा जास्त भावात कच्च्या मालाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२१ रोजी कच्च्या मालाची जास्तीत जास्त विक्री किंमत ₹६५०० क्विंटल ठरवण्यात आली होती. ही किंमत ३० जून २०२२ पर्यंत लागू असणार आहे. असे असले तरी कच्च्या मालाची भावपातळी यापेक्षा ₹७०० ते ₹८०० नी जास्त असल्याने कमी भावात माल मिळत नसल्याची मिल मालकांची तक्रार आहे. यंदा तागाचे उत्पादन जास्त झाले आहे, हे विशेष.

गेल्या वर्षी ताग उत्पादन कमी झाले होते. त्यात मागणी राहिल्याने यंदा शिल्लक साठा राहिलेला नाही. त्यामुळे यंदाच्या ताज्या मालाला चांगला भाव मिळतोय. भरीस भर म्हणजे यंदा अन्नधान्य साठवणुकीसाठी गोण्यांची गरज आहे. अशा वेळेला भावात अशी कृत्रिम कपात केल्याने उद्योगाचे नुकसान होऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com