महाराष्ट्र राज्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) आणि ऑगस्ट सुरुवातीपासून आजतागायत लागून असलेल्या पावसाने १५ लाख हेक्टरच्या पुढे खरीप पिकांचे नुकसान (Kharif Crop Damage) केले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णयही झाला आहे. मदतीसाठी पूर्वीची दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टर करण्यात आली आहे. पावसाचा दीड महिन्याचा कालावधी अजून बाकी आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पण चांगल्या पावसाचे अनुमान आहे. त्यामुळे पीक हाती येईपर्यंत अजून किती नुकसान होते, हे सध्यातरी सांगता येणार नाही. झालेल्या नुकसानीबाबतही मदतीची घोषणा झाली तरी पाहणी-पंचनामे-अहवाल-त्यास मंजुरी आणि त्यानंतर प्रत्यक्ष वाटप या प्रक्रियेत कोणाच्या पदरी किती पडतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राज्यात आतापर्यंत झालेल्या चांगल्या पावसाने खानदेश सोडला तर उर्वरित भागांतील धरणे बऱ्यापैकी (७५ टक्के) भरली आहेत. रीती असलेली धरणेही ऑगस्ट-सप्टेंबरच्या पावसाने भरतील, अशीच आशा आहे. धरणांबरोबरच भूपृष्ठांवरील इतर पाणीसाठे जसे की छोटे-मोठे तलाव, बंधारे, शेततळे भरली आहेत. भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने विहिरी, कूपनलिकांना सुद्धा चांगले पाणी आले आहे. त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई यंदा जाणवणार नाही, रब्बी व उन्हाळी हंगामदेखील चांगला राहील, असे वरवर वाटत असले, तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसते.
धरणांच्या संख्येत आपण देशात अग्रस्थानी असलो, तरी पाणी वापराबाबत मात्र तेवढेच पिछाडीवर आहोत. मुळात धरणे बांधतानाच भौगोलिक परिस्थिती, सिंचनाची गरज या बाबींचा विचार केला गेला नाही. तांत्रिक बाबीसुद्धा लक्षात घेतल्या नाहीत. कुठे धरणे असू नयेत, यासाठीच्या आदर्शवत जागेत राज्यात काही धरणे उभी आहेत. मोठ्या प्रकल्पांना झालेला विलंब, त्यातून वाढलेला खर्च, त्यातील गैरप्रकार यांनीच राज्यातील अनेक प्रकल्प चर्चेत राहिले आहेत. त्याद्वारे होत असलेल्या सिंचन क्षेत्राची चर्चा फारशी होताना दिसत नाही. चांगल्या पाऊसमानानंतर धरणांत बऱ्यापैकी पाणी असताना सुद्धा राज्याच्या अनेक भागांत उन्हाळ्यात पाणीटंचाई, खरीपात संरक्षित सिंचन तर रब्बी-उन्हाळी हंगामातील पिकांना वेळेवर पुरेशा पाण्याचा पुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला तरी सप्टेंबरमध्ये ऐन उमेदित पिके असताना (फुले-कळ्या-पाते-बोंडे-कणसे लागताना) पावसाचा खंड पडून उत्पादनात मोठी घट यापूर्वी झाली आहे. अशावेळी पिकांना एखादे संरक्षित सिंचन मिळाले तर पिके तर वाचतीलच, परंतु त्यांच्या उत्पादनात देखील वाढ होते. असे असताना खरिपात धरणातील पाण्यावर सिंचन हे जलसंपदा खात्याचा लेखीच नाही.
खरिपाच्या सिंचनासाठी कुठे गरज पडली तर धरणातले २० टक्के पाणी वापरावे, अशा मार्गदर्शक सूचना असूनही त्याचे कुठे पालन होत नाही. खरिपात सिंचन न करण्याची कारणे काय आहेत, हे पाहून त्यात सुधारणा करायला हव्यात. सप्टेंबरअखेरपर्यंत धरणांतील पाणीसाठा स्पष्ट धरणांतील पाणीसाठा स्पष्ट झाल्यावर रब्बी, उन्हाळी हंगामासाठी धरणनिहाय किती आवर्तने सोडणार? त्याच्या नेमक्या तारखा कोणत्या? हे बहुतांश धरणांच्या बाबतीत सिंचन अथवा पाटबंधारे खाते आगाऊ जाहीर करीत नाही.
त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे नियोजन करू शकत नाहीत. रब्बी पीक पेरणीनंतरही आवर्तने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार नाही तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीनुसार सोडले जातात. त्यामुळे पिकांना अपेक्षित लाभ होत नाही. या सर्व बाबी गंभीर असून, त्यामध्ये शासन-प्रशासनाने सुधारणा करायला हवात. कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या याची डागडुजी पावसाळ्यातच करून घ्यावी. म्हणजे रब्बीमध्ये लवकर आवर्तने सोडता येतील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.