
Vegetable Producer Farmer : जीवनावश्यक सेवा-वस्तूंच्या महागाईने देशभरातील जनता त्रस्त आहे. अशा महागाईच्या जमान्यात भाजीपाला-पालेभाज्या (Vegetable Rate) मात्र कमालीच्या स्वस्तात मिळत आहेत.
कांदा काढून तो बाजारात नेऊन विकणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी (farmer) त्यात रोटर फिरविलेली बातमी ताजी असतानाच पालेभाज्यांचे दर पडल्याची बातमी येऊन धडकली आहे.
कोथिंबिरीच्या जुडीला एक रुपया भाव मिळत असल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावरून जाणाऱ्या ग्राहकांना कोथिंबीर फुकट वाटून आपला रोष व्यक्त करीत आहेत.
भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) पडल्यावर शेतकरी जेव्हा त्यात रोटर फिरवितो, जनावरे सोडतो किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देतो, त्या वेळी त्यास सल्ले देणारे अनेक जण पुढे येतात.
वास्तविक पाहता या सल्ले देणाऱ्यांचा प्रत्यक्ष शेतीशी कधी, काहीही संबंध आलेला नसतो. शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीचे नियोजन (Vegetable Cultivation management) करायला हवे, ही भाजी लावायला नको, ती भाजी लावायला नको, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना भाजीपाला विकण्यापेक्षा थेट विक्री करायला पाहिजेत, फेकून देण्यापेक्षा भाजीपाला बाजारात नेऊन विकला तर दोन पैसे मिळतात, असे ते सल्ले असतात.
असे सल्ले देणाऱ्यांसाठी काही बाबी स्पष्ट करणे गरजेचे आहे. भाजीपाला काढणी, प्रतवारी तसेच वाहतूक करून बाजारात आणणे, ही कामे खर्चीक तर आहेतच.
परंतु त्याही पुढील बाब म्हणजे व्यापारी ठरवून भाजीपाल्याचे दर पाडतात, एवढेच नाहीतर अनेक बाजार कुप्रथांद्वारे लूट करून उलटी पट्टी शेतकऱ्यांच्या हाती टेकवतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी भाजीपाला बाजारात नेऊन विकण्यापेक्षा फेकून देतात.
भाजीपाल्याचे दर पडलेले असतात त्या वेळी ग्राहकांकडून त्यास मागणी नसते, असेही नाही. शेतकऱ्यांकडून एक रुपयाला घेतलेल्या कोथिंबिरीच्या जुडीच्या चार जुड्या करून व्यापारी प्रति जुडी पाच ते दहा रुपयांना शहरी ग्राहकांना विकतात.
शेतकऱ्यांकडून रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेला टोमॅटो शहरात २० ते २५ रुपये किलोने विकला जातो. असे विरोधाभासाचे चित्र भाजीपाल्याबाबत अनेकदा पाहायला मिळते.
अर्थात, भाजीपाल्याच्या बाबतीत उत्पादक उपाशी अन् व्यापारी तुपाशी अशी परिस्थिती नेहमीच असते. अशा वेळी शेतकऱ्यांचे नियोजन चुकत नसून दोष शेतीमाल विक्री व्यवस्थेत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आणि हा दोष दूर करण्याचा प्रयत्न शासन-प्रशासनाकडून होत नाही, ही बाब उत्पादकांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. शहरांना लागून असलेल्या ज्या काही शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करणे शक्य आहे, असे शेतकरी थेट विक्री करीत आहेत.
त्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरांपासून दूरच्या बहुतांश शेतकऱ्यांना असे करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना भाजीपाला जवळच्या बाजार समितीत नेऊन नाही तर गावात व्यापाऱ्यांना विकावा लागतो.
शेतीमालाच्या बाबतीत दरात चढ-उतार चालूच असतात. परंतु नाशिवंत भाजीपाल्याचे दर खूपच अनिश्चित असतात. वर्षभराचा विचार केला, तर फार कमी कालावधीसाठी भाजीपाल्याचे दर चढे असतात.
उर्वरित बहुतांश वेळा ते कमीच असतात. अनेकदा व्यापारी ठरवून भाजीपाल्याचे दर पाडतात, त्या वेळी बाजार समिती प्रशासन काय करते, हा खरा प्रश्न आहे.
कांदा, कोथिंबीर असो की टोमॅटो यांच्या सरासरी उत्पादनखर्चाचा अंदाज बाजार समितीला असतो. अशा वेळी या उत्पादन खर्चाच्या वरच दर शेतकऱ्यांना मिळतील, हे बाजार समिती प्रशासनाने पाहायला हवे.
भाजीपाल्याचा उत्पादन खर्चाचा त्यांना अंदाज येत नसेल तर पीक अन् हंगामनिहाय उत्पादन खर्च ठरविण्यासाठी प्रत्येक बाजार समितीने वेगळी कमिटी स्थापन करायला हवी. या कमिटीने व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता उत्पादन खर्चानुसार भाजीपाल्यास दर मिळेल हे पाहावे.
नाशिवंत भाजीपाल्यासाठी क्लस्टरनिहाय काढणीनंतर शीत साठवणुकीच्या सोयीदेखील राज्य शासनाने उपलब्ध करायला हव्यात.
त्याला जोडूनच प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तर भाजीपाल्याची मागणी वाढून दर चांगले मिळतील. विशेष म्हणजे बाजारात एकदमच भाजीपाल्याची आवक वाढून दर पडणार नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.