
मकर संक्रांत (Makar Sankrant) पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे, १४ अथवा १५ जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो. राज्यातील थंडीचे (Clod) प्रमाणही कमी होत जाऊन उष्णतामान (Heat) वाढू लागते. अशावेळी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात अचानक तापमानात सातत्याने घट आढळून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी विदर्भातील गोंदिया येथे ६.८ अंश सेल्सिअस अशा नीच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. तर काल निफाड (नाशिक) तसेच परभणी येथील तापमान ५ अंश सेल्सिअसवर आले होते. कडाक्याच्या थंडीबरोबर दाट धुक्याची चादरही राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.
एवढेच नाही तर आठवडाभरापासून राज्यात ढगाळ वातावरण देखील आहे. थंडी, धुके आणि ढगाळ वातावरणाचा एकत्रित परिणाम रब्बी हंगामातील पिके तसेच फळे-भाजीपाल्यावर स्पष्ट दिसून येतोय.
रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत थंडी अनुकूल असते. परंतु धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हंगामी पिके तसेच फळे - भाजीपाला यावर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढतोय.
पिकांची वाढ खुंटते. फळ पिकांच्या मोहोरात तसेच बहर व्यवस्थापनात बाधा निर्माण होते. मुळात यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबला. त्यानंतर थंडी पडणे अपेक्षित होते. परंतु राज्यातून थंडी गायब झाली आणि आता थंडीत अचानक वाढ झाली आहे.
सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण असले म्हणजे थंडी कमी होते. परंतु यावेळी ढगाळ वातावरणासह हवेत गारठा आहे. हा गारठा अजून चार दिवस राहणार असल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या अशा बदलत्या वातावरणात विभाग आणि पीकनिहाय व्यवस्थापनाचा सल्ला कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना द्यायला हवा. शेतकऱ्यांनी सुद्धा तज्ञांचा सल्ला तसेच आपल्या अनुभवातून पीक व्यवस्थापन करून नुकसान होणार नाही, अथवा कमीत कमी नुकसान होईल, हे पाहावे.
आपल्याकडे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, गारपीट आदींनाच नैसर्गिक आपत्ती मानून नुकसान भरपाई अथवा शासकीय मदत देण्याची प्रथा पडली आहे. मागील काही वर्षांपासून कडाक्याची थंडी, धुके, उन्हाळ्यातील ४८ अंश सेल्सिअस दरम्यानचे तापमान यातही पिकांचे नुकसान होत असून या देखील नैसर्गिक आपत्तीच आहेत.
अशा आपत्तींतही पाहणी, पंचनामे करून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याचे नियोजन झाले पाहिजेत. एका पाठोपाठ येणाऱ्या आपत्तींनी शेतकरी कोलमडून पडत आहेत. अशावेळी त्यांना शासकीय मदतीतूनच उभे करता येते, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्याच्या अशा विचित्र वातावरणाने हवामान बदलाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुळात मागील दीड-दोन दशकांपासून ऋतू, हंगाम खूपच अनियमित झाले आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी, धुक्याचे वाढते प्रमाण दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठा बदल, अति उष्णतामान यांची वारंवारता आणि तीव्रताही वाढत आहे. अशा विपरित हवामानाचा फटका पिकांना बसत आहे.
पिकांचे नुकसान वाढत आहे, उत्पादकताही घटत आहे आणि उत्पादन खर्च मात्र वाढतोय. अशावेळी हवामान बदल हा विषय कृषी तज्ञांसह केंद्र-राज्य शासनाने देखील गांभीर्याने घ्यायला हवा. प्रत्येक ऋतूत विभागनिहाय हवामानातील बदल आणि त्यांचा स्थानिक पिकांवर होणारा परिणाम यांचा बारकाईने अभ्यास झाला पाहिजे.
हवामान बदलासंदर्भात जागतिक पातळीवरील चर्चा आता खूप झाल्यात. त्यामुळे स्थानिक पातळीवर याचा शेतीच्या नुकसानीच्या अनुषंगाने विचार होऊन त्यावर मात करण्याच्या अनुषंगाने उपाय शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे बदलत्या हवामानास पूरक पिकांच्या जाती तसेच पीक व्यवस्थापन तंत्र शेतकऱ्यांना मिळायला हवे. असे झाले तरच बदलत्या हवामानात शेतकरी आणि त्यांची शेती टिकेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.