नांदेड : जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून पावसाचा (Rain) खंड पडला आहे. उन्हामुळे पीक करपून (Crop Burn Due To Heat) चालली आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीला पीक विम्याच्या (Crop Insurance) संरक्षित रकमेपैकी २५ टक्के अग्रिम (ॲडव्हान्स) रक्कम देण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना संघटित करून तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते कैलास येसगे यांनी दिला.
देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात त्यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यांत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सलग पंचवीस ते तीस दिवस अतिवृष्टी झाली. कृषी व महसूलने केलेल्या प्राथमिक पंचनामा अहवालात जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे.
उन्हामुळे पीक करपत आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीला पीक विम्याच्या संरक्षित रकमेपैकी २५ टक्के अग्रिम देण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतात पाणी उपलब्ध असूनही महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. यामुळे महावितरण कंपनीवर कारवाई करून शेतीसाठी १२ तास वीज वितरित करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
लवकरच निर्णय
याबाबत लवकरच निर्णय घेऊन २५ टक्के आगाऊ पीकविमा देण्याबाबत अधिसूचना काढू व महाविरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले, असल्याचे येसगे यांनी सांगितले. या वेळी बालाजी कनकंटे, जयपाल कांबळे, सूर्यकांत माळगे, ॲड. राहुल देशमुख, बसवंत पाटील, सुभाष जाधव उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.